शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील देऊर कमखेडा, टेंबा शिवारात अचानक लागलेल्या आगीमुळे 11 शेतकऱ्यांचा सुमारे 50 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र अचानक आग लागलेल्या अकरा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली होती. आगीने रौद्ररूप धारण केल्याने पाहता पाहता सुमारे 50 हून अधिक एकरातील ऊस जळून खाक झाला आहे आग विझवण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. यावेळी मिळेल त्या साधनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा संबंधितांनी पंचनामा करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ऐन तोडणीवर आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.








