तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात असलेल्या गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने रांझणी शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम असून यामुळे शेतशिवारातील राखणदार, शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.१२ मार्च रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास रांझणी येथील जैन कृषि विद्यालयात असलेल्या गायीच्या गोठ्यात बिबट्या शिरून गोठ्यात बांधलेल्या वासरूवर हल्ला केला. मात्र याच वेळी शाळेतील रखवालदार भरत ठाकरे यांना गोठ्यातून काहीतरी आवाज येत असल्याने ते गायीच्या गोठ्याकडे धावत गेले असता गोठ्यात बांधलेल्या गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसल्याने रखवालदारांने जोरजोरात आरडाओरड केल्याने वासरू सोडून बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी झाले आहे. यामुळे रांझणी शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचाराने रखवालदार, शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
गायीच्या गोठ्यातून काही तरी आवाज येत असल्याने गोठ्याकडे गेलो असता गायीच्या गोठ्यातील गायीच्या वासरूवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसून आल्याने जोरजोरात आरडाओरड केली असता बिबट्याने गोठ्यातून पळ काढला.
-भरत ठाकरे, रखवालदार