नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील हाटमोहिदा येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला आहे. याप्रकरणी महावितरणकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.दरम्यान शेतकऱ्याने भरपाई न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा येथे काल दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास हाटमोहिदा शिवारात नाशिंदा गावाच्या कमानीजवळील ऊसाच्या शेताला आग लागली. यामध्ये गिरधर गोरख पाटील व युवराज राजाराम पाटील या दोन्ही शेतकऱ्यांचा मिळून सुमारे सहा एकर ऊस आगीत जळून खाक झाला. गिरधर पाटील यांच्या शेतात असलेल्या ११ के.व्ही. हाटमोहिदा वाहिनीच्या लोखंडी पोलवर स्पार्किंग झाल्यामुळे ऊसाला आग लागली. वाऱ्यामुळे आग पसरत थेट सुमारे सहा एकरमध्ये पसरुन ऊसाची राख झाली आहे. यावेळी ३३/११ के.व्ही. कोपर्ली उपकेंद्रातून निघणारा ११ के.व्ही. हाटमोहिदा वाहिनीचा विद्युत पुरवठा सुरु होता. यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग पसरत जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या कनिष्ठ अभियंता श्रीमती मोरे यांच्यासह वायरमन सागर चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन महावितरणतर्फे पंचनामा केला आहे. यावेळी उमाकांत चौधरी, युवराज पाटील, प्रशांत पाटील, गजराजसिंग जमादार, योगेश पाटील, वसंत कोळी उपस्थित होते.
शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा सुमारे सहा एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला आहे. याप्रकरणी महावितरणकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.