नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात भांडणातून दोन गटात हाणामारी झाली. यात बियरच्या बाटलीने दोघांना मारहाण करण्यात आल्याने दोन्ही गटातील तिघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील गुलीउंबर येथील आकाश शांताराम वळवी व तुषार गोविंद वळवी हे दोघे खापर गावातील यात्रेतून घरी जात होते. यावेळी मोठा उदेपूर गावातील चौघांमध्ये सुरु असलेल्या भांडणादरम्यान नितीन सावंत वसावे याने फेकून मारलेला दगड आकाश वळवी याच्या कपाळाला लागून दुखापत झाली. याबाबत आकाश वळवी व तुषार वळवी यांनी जाब विचारला असता नितीन वसंत वसावे, अरुण सरदारसिंग वसावे, जयदिप रविंद्र वसावे तिघे रा.छोटा उदेपूर ता.अक्कलकुवा व हेमंत ब्रिजलाल वसावे रा.काकडखुंट ता.अक्कलकुवा या चौघांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच तुषार वळवी यांना नितीन वसावे याने बियरची बाटली डोक्यात मारुन दुखापत केली. याबाबत आकाश वळवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३३६, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जयदिप रविंद्र वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, खापर येथील यात्रेत शरद दिलीप वसावे, अश्विन राजेश वसावे व गुलीउंबर येथील महेश करमसिंग वसावे यांचे आपसात भांडण सुरु होते. सदर भांडण सोडविण्यासाठी जयदिप वसावे गेले असता महेश करमसिंग वसावे याने काचेच्या बाटलीने कपाळावर मारुन दुखापत केली. तसेच जयदिप यांचा मित्र हेमंत ब्रिजलाल वसावे यांना सुभाष शिवाजी वळवी, राकेश नानसिंग वळवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत जयदिप वसावे यांच्या फिर्यादीवरुन अक्ककलुवा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.