नंदुरबार l प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ७५ कि.मी. आझादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. नंदुरबारात १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पदयात्रेचा शुभारंभ बाजार समिती मैदानापासून होणार आहे. नाट्यमंदिरात समारोप झाल्यानंतर तेथेच मेळावादेखील होणार आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे मार्गदर्शन करणार आहेत.
स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मे यांना मानवंदना देणे, नागरिकांमध्ये
देशाप्रती जागृती निर्माण करणेआदींसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,आमदार ॲड. के. सी. पाडवी, माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पद्माकर वळवी,प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरिषकुमार नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हा प्रभारी राजाराम पानगव्हाणे, निरीक्षक रणजीत पावरा यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा निघणार आहे.
सकाळी १० वाजता बाजार समितीपासून यात्रेचा शुभारंभ होईल. महाराणा प्रताप चौक, बसस्थानक,
नेहरू पुतळा, हाट दरवाजा, गणपती मंदिर, सोनारखुंट, टिळकरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोठा मारुती मंदिरमार्गे श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात समारोप होणार आहे.