नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील तलवाडे शनिमांडळ येथे शेतीच्या बांधावरुन दोन गटात वाद निर्माण झाला.या वादातून मारहाणीत चार जण जखमी झाले असून याप्रकरणी परस्पर फिर्यादीतून सहा जणांविरूद्ध नंदूरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे शनिमांडळ येथे शेतीच्या कारणावरुन नरेंद्र विठ्ठल धनगर, राजेंद्र विठ्ठल धनगर व गोकुळ नरेंद्र धनगर या तिघांनी पराग दौलत धनगर व विवेक दौलत धनगर या दोघा भावांना मारहाण करत शिविगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.याबाबत पराग धनगर यांच्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ.ज्ञानेश्वर सामुद्रे करत आहेत तर याप्रकरणी नरेंद्र विठ्ठल धनगर यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की, विवेक दौलत धनगर, पराग दौलत धनगर व भिला कथ्थू धनगर हे तिघेजण नरेंद्र धनगर यांच्या शेताच्या बांधावरुन जात असतांना नरेंद्र धनगर यांनी त्यांना बांधावरुन जाण्यास मनाई केली.याचा राग आल्याने तिघांनी नरेंद्र धनगर व गोकुळ नरेंद्र धनगर यांना मारहाण केली.याबाबत नरेंद्र धनगर यांच्या फिर्यादीवरुन तिघां संशयितांविरोधात भादंवि कलम ३२६,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी करत आहेत.








