नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिमान आणि कृतज्ञतेचा सुवर्णक्षण साजरा करण्यात आला. ज्ञान, समता आणि न्याय यांच्या मूल्यांची उजळणी करत विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि लहू बुधा सरोदे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून का. वी. प्र. संस्था, भालेरचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील उपस्थित होते. तसेच सेना सरोदे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, पी. पी. बागुल, अभिमान पाटील, दीपक पिंपळे , प्राचार्य पी. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक पी. डी. पाटील यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमात दीपक पिंपळे यांनी विद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी प्रतिमा भेट देऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या हस्ते विद्यालयात १८ तासांच्या वाचन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्याबरोबरच विचारसरणीला नवे क्षितिज मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात लहू सरोदे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, “शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे शस्त्र आहे,” असे सांगितले. प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मार्गावर सातत्याने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या सोहळ्याने केवळ अभिवादनाचा नव्हे, तर ज्ञान आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित करत विद्यार्थ्यांच्या मनात नवे स्वप्न रोवण्याचे कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्हि. इशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले








