आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासी संस्कृती आणि परंपरा जतन करणे ही काळाची गरज असून निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आदिवासी समाजाचे जीवन निसर्गाशी अतूटपणे जोडलेले आहे. सध्या पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून देवमोगरा मातेच्या कृपेने परिसरात भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक यावे आणि बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केली.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवमोगरा माता गड मंदिराच्या नव्या वास्तूच्या उभारणीला रविवारी आदिवासी परंपरा, धार्मिक विधी आणि निसर्गपूजेच्या साक्षीने प्रारंभ झाला. मंदिराच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन पारंपरिक ढोलवादन, काकड देवपूजा, मोगरा माता पूजा आणि निसर्गपूजा करून करण्यात आले. यावेळी परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक यावे आणि बळीराजाच्या आयुष्यात आनंद व समृद्धी यावी, यासाठी निसर्गदेवतांना साकडे घालण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. हिना गावित होत्या, तर उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, सरपंच राजनंदिनी भिल, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग पाडवी, जिल्हा परिषद सदस्या भारती भिल, माजी सभापती सी. के. पाडवी, मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा रेखा पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन शेवाळे, आदिवासी एकता परिषदेचे चांगल्या भिल, किशन महाराज, ईश्वर पूजक, विकासोचे अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी सरपंच भावडू ठाकरे, अंबालाल भिल, अमृत ठाकरे, नंदकिशोर पटेल, ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील, पवन चौधरी, धनंजय चौधरी, रफिक खाटीक, अमृत नाईक, संजय पाडवी, दिलबर वळवी, विक्रम पवार, विनेश महाजन, रंजना नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवमोगरा माता गड ट्रस्टच्या अध्यक्षा रेखाबाई पाडवी, उपाध्यक्ष बस्तीराम नाईक, इच्छाराम नाईक, संजय पाडवी, जमसिंग ठाकरे, अरुण ठाकरे, विनेश महाराज, निलसिंग पवार, दारासिंग ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमन ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन अमृत नाईक यांनी केले, तर बस्तीराम नाईक यांनी आभार मानले. धार्मिक वातावरणात आणि आदिवासी संस्कृतीच्या जपणुकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास भाविक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.








