नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, पेरणी केलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांच्या बियाण्याचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत नंदुरबार येथील संजय टाऊन हॉलमध्ये झालेल्या बूथ कार्यकर्ता (बीएलए) मेळाव्यात ते बोलत होते. पुढे श्री.मुश्रीफ म्हणाले की, राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला आहे. विशेषत: नंदुरबार आणि शहादा तालुक्यात पावसाअभावी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी पावसाने पाठ फिरवल्याने कापूस व सोयाबीनसह खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. जर पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी शासन बियाण्याचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य टंचाईचा विचार करुन प्रशासनासोबत नियोजन बैठक घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नर्मदा खोऱ्यातील १० टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला मिळाले असून, भविष्यात हे पाणी जिल्ह्यातील शेतकर्ऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेचा उल्लेख करत मुश्रीफ म्हणाले की, मतदार नोंदणीसाठी शासनाने २९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांने गावागावातील प्रत्येक मतदाराची नोंदणी पूर्ण करण्यासाठी जबाबदारीने काम करावे. नंदुरबार जिल्ह्यात जो पर्यंत मी पालकमंत्री असे पर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा असल्याचे आश्वासीत केले. दरम्यान पुढे बोलतांना श्री. मुश्रीफ यांनी विविध माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्टवादी स्व.अजित पावरांचे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे सांगत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, २२ ते २४ जुलैदरम्यान कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे म्हणाले की, राज्यात सेवा सप्ताह २२ जुलैपासून सुरू होत असला तरी नंदुरबार जिल्ह्यात १३ जुलैपासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून, एसआयआर नोंदणीसह आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकर्त्यांना देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेशी थेट सामना करण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यास पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, भरत गावित, जि.प.माजी सभापती रतन पाडवी, नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, जयवंत जाधव, योगेश चौधरी, माजी जि.जि.सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सिताराम पावरा, डॉ. सुरेश नाईक, महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगीर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








