नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसैनिकांनी आपापसातील संवाद वाढवून पक्ष वाढवला पाहिजे.कार्यकर्त्यांना संकटसमई मदत करणारा पक्षच आपल्या कामाचा असतो.कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी चालेल. परंतु,त्यांची पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे.ज्यांच्यात पक्ष संघटन वाढवण्याची खरोखरच ताकद असेल त्यांनाच पद दिली जातील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते,आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले.
शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने शहरातील मीरा प्रताप लॉन्समध्ये भव्य पक्षप्रवेश तसेच पदाधिकारी नियुक्ती विचार-विनिमय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात रायखेड,मलगाव भुलाने,कानडी,सुलवाड़े,सुलतानपूर,कुसुमवाडे, मामाचे मोहिदा,वैजाली आदी गावातील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करताना आ.रघुवंशी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर,तालुका प्रमुख मनलेश जायसवाल,शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, सागर चौधरी, लक्ष्मण पवार,एकनाथ ठाकरे,संगीता पवार,प्रियंका ठाकरे,हेमंत सूर्यवंशी,राकेश पाटिल आदी उपस्थित होते. आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,शिवसेना ही तळागाळातील लोकांच्या संघटन करणारी पक्ष संघटना आहे. कार्यकर्त्यांनी कुठल्याही बाबतीत अन्याय सहन करू नये. कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी चालेल परंतु, त्यांची पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. शिवसेनेच पद हे काम करून झटणाऱ्या व्यक्तीला मिळाला पाहिजे.
आ.आमश्या पाडवी यांनी एसआयआर मोहिमेबाबत शिवसेनेची भूमिका मांडली.ते म्हणाले, शिवसैनिकांनी आपापल्या गाव पाड्यावरील व्यक्तींच्या एसआरआय फॉर्म भरून घ्यावा जेणेकरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत. या मोहिमेकडे कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करू नये.
नंदुरबार लोकसभा संपर्कप्रमुख,माजी आ. शिरीष चौधरी म्हणाले,या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करायची आहे. पक्षात इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी जिल्हाप्रमुखांकडे द्या.ज्यांच्यात पक्ष संघटन वाढवण्याची खरोखरच ताकद असेल त्यांनाच पद दिले जातील. दोन-चार दिवसात यादी तयार झाल्यानंतर पक्षाच्या सचिवांकडे अहवाल सादर करण्यात येईल त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.
यावेळी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. रायखेड,मलगाव भुलाने, कानडी,सुलवाड़े, सुलतानपूर,कुसुमवाडे,मामाचे मोहिदा,वैजाली आदी गावातील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. सूत्रसंचालन ॲड.भोजेंद्र शिंदे यांनी केले.







