नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार नगरपालिकेने आजपर्यंत झालेल्या सर्वेचा अहवाल सादर केलेला नाही. लाभार्थ्यांच्या याद्या बनवलेल्या नाही. शहरातील बेघर आदिवासींना घरकुल मिळवून देण्याची जबाबदार कृती केलेली नसताना आमदार चंद्रकांत रघुवंशी हे टीका करत असतील तर ते चुकीचे आहे. शहरातील बेघर आदिवासींच्या घरकुलासाठी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पालिकेला मिळवून दिलेला सुमारे 1 हजार 200 लाख रुपयांचा निधी परत जाणार असेल तर त्याला नंदुरबार नगरपालिका आणि या नगरपालिकेचे सत्ताधारी जबाबदार राहतील हे आम्ही पुन्हा सांगत आहोत आणि शहरातील बेघर आदिवासींना घरकुलाचा लाभ नगरपालिका देणार नसेल तर मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, हे पुन्हा जाहीर करीत आहोत; असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तथा विरोधी गटनेते आनंदा माळी आणि नगरसेवक लक्ष्मण माळी यांनी दिला आहे.
शहरातील बेघर आदिवासींच्या घरकुलासाठी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पालिकेला मिळवून दिलेला सुमारे 1 हजार 200 लाख रुपयांचा निधी परत जाऊ न देता त्याचा वेळेत विनियोग करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी मागील आठवड्यात दिलेला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काल माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर टीका केली. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंत्री असताना शबरी घरकुल योजनेतून शहरी बेघरांसाठी निधी मंजूर केला तथापि त्या बेघर अतिक्रमितांच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न सोडवला नव्हता म्हणून आजपर्यंत हा मुद्दा रखडला; असे स्पष्टीकरण देताना रघुवंशी यांनी लवकरच सर्वे करणार असल्याचे जाहीर केले. या सर्व संदर्भाने भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण माळी आणि आनंद माळी यांनी रघुवंशी यांचे आरोप खोडणारे प्रत्युतर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, वास्तविक राज्यात नगरपालिका हद्दीतील बेघर आदिवासींसाठी घरकुल योजना नव्हती. आदिवासी विकास मंत्री असताना आमचे नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राज्यात प्रथम तशी योजना लागू केली. नगरपालिका हद्दीतील बेघर आदिवासींना शबरी घरकुल योजनेतून घरकुल देण्यासाठी त्यांनी मान्यता मिळवून दिली एवढेच नाही तर नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीत स्वतःच्या मालकीचे घर नसलेल्या आदिवासी रहिवासींसाठी सुमारे 1हजार 200 लाख रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून दिला. परंतु त्याचा योग्य वेळेत विनियोग केला जात नसल्यामुळे तो व्यपगत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नंदुरबार शहरातील बेघर आदिवासी सुद्धा यामुळे वंचित राहणार आहेत. त्यांना वेळेवर न्याय देण्याचे सोडून रघुवंशी यांनी डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्यावर टीका करणे अत्यंत चूक आहे, असे लक्ष्मण माळी यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, नियमानुसार पाहता शहरातील बेघर आदिवासींसाठी संपूर्ण स्लम एरियातून सर्वे करून घेण्याची जबाबदारी नंदुरबार नगरपालिकेची होती. एकूण किती लाभ धारक असू शकतात याची यादी बनवण्याची जबाबदारी सुद्धा नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांची होती. ती त्यांनी पार पाडलेली नाही. नंदुरबार शहरात किती बेघर आदिवासी आहेत याची यादी नंदुरबार नगरपालिकेकडून आदिवासी विकास विभागाला सादर केली जाणे आवश्यक होते ती त्यांनी केलेली नाही. त्या अतिक्रमित घर धारकांकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही असे ते सांगतात पण पूर्ण अभ्यास नसल्यामुळे रघुवंशी हे दिशाभूल करणारी माहिती देत आहेत, असे नमूद करून लक्ष्मण माळी यांनी पुढे सांगितले की, नंदुरबार शहरात आदिवासी बेघर धारकांनी जे काही अतिक्रमण केलेले आहे ते बहुतांश स्वरूपात शासकीय जमिनीवर आहे. रघुवंशी यांनी अनेकदा शासकीय जमिनी स्वतःसाठी नियमित करून घेतल्या, मग शहरातील घरकुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी बेघर आदिवासींच्या जागेचा प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न करून त्यांनी पुढे सांगितले की, यापुढे लवकरच सर्वे केला जाईल असे ते जे सांगत आहेत ते सुद्धा चूक आहे. नंदुरबार नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून याच्यापूर्वी असे सर्व केलेले आहेत पण त्याचे अहवाल कधीच सादर केलेले नाही. रघुवंशी यांना आम्ही स्मरण करून देतो की, आदिवासींकडे जागा नसेल तर त्यांनी मागील तीन वर्षांच्या पावत्या दाखवाव्या असा नियम नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून यांनीच लागू केला होता. मग आता जागा नसल्याच्या नावाखाली का लपत आहेत? त्यांनी वेळेत घरकुल योजनेच्या निधीचा विनीयोग केला नाही तर मोठ्या आंदोलन करू हे आम्ही पुन्हा सांगतो. ही मागणी आमच्याप्रमाणेच याच्यापूर्वी आदिवासी संघटनांनी केलेली आहे तसेच उभाठा शिवसेनेने सुद्धा मांडलेली आहे. रघुवंशी यांनी दिशाभूल करू नये आणि नंदुरबार नगरपालिकेने शहरातील बेघर आदिवासींचा निधी वेळेत वेळेत उपयोगात आणावा अन्यथा आंदोलन केले जाईल हे आम्ही पुन्हा जाहीर करीत आहोत असे लक्ष्मण माळी व आनंद माळी यांनी म्हटले आहे.








