नंदूरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ‘एक देश एक खत’ ( प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना ) ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. या योजनेमुळे खत टंचाई होणार नाही. त्याचबरोबर किफायतशीर दरात खते उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात खर्चात मोठी बचतही होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हिताची आणखी एक योजना सुरू केल्याबद्दल नवापुर तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.
त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘ एक देश एक खत ‘ योजनेमुळे सर्व खते एकाच म्हणजे भारत ब्रँड या नावाने बाजारात उपलब्ध होतील. भारत युरिया, भारत डीएपी, भारत एनपीके या नावाने बाजारात खतांची विक्री होईल. एकाच ब्रँडची विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ होणार नाही.
तसेच खते रास्त दरात उपलब्ध होतील. आपल्या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी कंपन्या अनेक युक्त्या करीत असतात.त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.सर्वाधिक मागणीच्या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे प्रकारही घडतात.’एक देश एक खत’ या योजनेमुळे खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होईल.
महत्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांच्या खतांमधील घटक पदार्थाचे प्रमाण समान राहणार आहे डीएपी खताचे उत्पादन वेगवेगळ्या कंपन्यांनी केली तरी त्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरसचे प्रमाण अनुक्रमे 18 आणि 46 टक्केच असले पाहिजे.असा नियम करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. तसेच मोदी सरकारने सुरू केलेल्या किसान समृद्धी केंद्रांमुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.या केंद्रांमध्ये खते, बियाणे,औषधी, औषधांची अवजारे यांची विक्री होईलच त्याचबरोबर माती, बियाणे आणि खतांचे परीक्षणही होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.








