नंदुरबार | प्रतिनिधी
तामसवाडी ता.साक्री येथील रहिवासी व माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जखाणे ता.शिंदखेडा या विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर भिमराव सोनवणे यांनी आपल्या नख चित्रकलेच्या माध्यमातून भगवत्गीतेतील १४०० ओळींचे ७०० श्लोक साकारले आहेत. ही भगवत्गिता साकारायला त्यांना तब्बल दोन वर्षांचा कालावधी लागला आहे.
मानवी जीवनात चित्रकलेचं स्थान अनन्यसाधारण आहे. चित्रकलेमुळेच आजतागायत मानवाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. या कलेमुळे आजपर्यंत अनेक कलावंत समृद्धीच्या शिखरावर पोहोचलेले आहेत. अशाच कलावंतांमध्ये ज्ञानेश्वर भिमराव सोनवणे यांचे नाव घेता येईल.
ज्ञानेश्वर भिमराव सोनवणे हे तामसवाडी ता.साक्री येथील रहिवासी असून ते माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व जखाणे ता.शिंदखेडा, जि.धुळे या विद्यालयात कला शिक्षक म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी पाचवीच्या वर्गात असतानाच होईल तर कलाशिक्षकच होईल, असे ठरवले होते. त्यांना लहानपणापासूनच कलेत काहीतरी वेगळं करण्याची उर्मी होती. सन २००० या वर्षापासून कला क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले आणि कला क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याची खूणगाठ त्यांनी त्यावेळेस बांधून घेतली होती. धुळे येथे आदर्श चित्रकला महाविद्यालयात जी.डी आर्टसाठी प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी नखचित्र कलेचाही सराव सुरू ठेवला. आजवर त्यांनी शेकडो नख चित्र केलेली आहेत. नाशिक येथील केटीएचएम कॉलेजमध्ये चित्रकलेचे अंतिम वर्ष डी.ए.एड ला असताना कॉलेजमध्ये नखचित्रांचे प्रदर्शन भरविले होते. त्यावेळेस सर्व महाविद्यालयाचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. हाताच्या दोन बोटांनी नखचित्र कसे तयार केले जाते याचे प्रात्यक्षिकही सादर केले होते.
या कलेला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून द्यावा असा श्री. सोनवणे यांचा मानस आहे. खूप वर्षांपासूनची त्यांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी भगवद्गीता या नखचित्रकलेच्या माध्यमातून दि.५ मे २०२२ रोजी लिहून पूर्ण केली. भगवद्गीतेत एकूण ७०० श्लोक आहेत. म्हणजेच १४०० ओळी आहेत. त्या कलेच्या या अंगातून लिहितांना मनाला उभारी देऊन गेल्यात.
लिहायला सुरुवात ही पहिल्या लॉकडाऊनच्या आधी केली होती. दिवसाचे सात ते आठ तास या कामासाठी ते वेळ देत होते. एक श्लोक लिहायला सलग बैठक मारली तरी दीड ते दोन तास लागतात. दोन ते अडीच वर्षात भगवदगीता या माध्यमात ते लिहित होते. याच्या आधी असा प्रयोग कुठेही झालेला नाही, याची श्री सोनवणे यांना खात्री आहे.नख चित्रकला ही तशी दुर्मिळ समजली जाणारी कला आहे. कागदावर हाताच्या अंगठा व मध्यमा या दोन बोटांच्या नखांची ठराविक वाढ करुन तयार केले जाते. ते अतिशय नाजूक आणि काळजीपूर्वक पद्धतीने केले तर ही कला अवगत होते. कुठलीही कला शिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तुमच्यात ही कला शिकण्याची आवड आणि वेळ देता येत असेल तर ही कला साध्य करता येते. नखचित्रकार श्री.सोनवणे हे स्वतः सन १९९८ ते २००० या कालावधीत साक्री येथे स्व.जगन्नाथ जाधव आणि मोहन जाधव यांच्या सलून दुकानावर कामाला होते. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने शिक्षणासोबतच पार्ट टाइम जॉब करून आठ वर्ष केवळ चित्रकलेसाठी वेळ दिला. साक्री येथे सुर्वे तात्या नावाचे सुप्रसिद्ध व्यक्ति नखचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. श्री.सोनवणे हे त्यांच्या सलूनवर जाऊन त्यांचे काम पाहिले आणि त्यांना ही कला इतकी आवडली की शिकण्याचा मोह आवरताच आला नाही. मग फावल्या वेळात जसा वेळ मिळेल तसे ते त्यांच्याकडे जाऊन त्यांचे काम पाहत होते, शिकत होते. त्यांचे चित्रकलेचे घेतलेले आठ वर्षाचे प्रशिक्षण या कलेत वापरता आले. या कलेतल्या गुरूंना एकदा या भगवदगिता लेखनाबद्दल बोलले व काही नखचित्र दाखवले असता त्यांना प्रचंड आनंद झाला.
माझ्या चित्रांपेक्षा तुझी चित्रे नक्कीच सरस आहेत. मला असे काही जमले नाही पण तू वेगळं काही करतोय जे खरोखर सुंदर आहे. असेच कार्य करत रहा असे त्यांचे गुरु म्हणत. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. अशा कलावंताकडून या कलेचा वारसा त्यांना मिळाला.
या कलेत वेगळे काहीतरी करण्यासाठी सतत प्रोत्साहित करणारी त्यांची आई सौभाग्यवती सुशीलाबाई भिमराव सोनवणे व वडील भिमराव बळीराम सोनवणे यांनी कलेची बाळघुटी बालवयातच पाजली असावी.तसेच त्यांच्या पत्नी सौभाग्यवती. शशिकला ज्ञानेश्वर सोनवणे या नूतन माध्यमिक विद्यालय खोंडामळी ता. जि. नंदुरबार येथे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही सतत प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. माणसाला परिवारातून आणि समाजाकडून प्रोत्साहन मिळाल्याशिवाय कुठलीही महत्वाचे कार्ये घडत नाहीत.या कामामुळे श्री.सोनवणे यांचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील व प्राचार्या शैलजा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक कर्मचारी संघटनेतील सर्व मान्यवर मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सल्लागार, संचालक यांचे प्रोत्साहन त्यांना मिळाले. या कार्यामुळे श्री सोनवणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.