नंदुरबार l प्रतिनिधी
नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळ अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे झाले आहे. अशा परिस्थितीत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
पंचायत समिती सभागृहात आज जलजागृती सप्ताह कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खैरनार, उप कार्यकारी अभियंता मीनल वाघ, सुमास गावित, गट विकास अधिकारी महेश वळवी, उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे प्रा.एन.एम.भामरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत केले जात आहेत. मात्र, पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचे प्रश्न संपणार नाहीत. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्त्रोत, नद्या व जलाशयाचे प्रदुषण रोखणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन करणे याबाबत समाजात जनजागृती निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.पवार म्हणाले की, आपल्या पृथ्वीवर पिण्याचे पाणी व वापराचे पाण्याचासाठा अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पाणी संवर्धन करताना भूगर्भामध्ये पाण्याची पातळी कशी वाढेल याची जनजागृती करण्याची काळाजी गरज आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. भूजल पातळी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी वृक्ष लागवडीचे कामे करावीत.
श्री.चिनावलकर म्हणाले की, 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येत असून विविध विभागानी आपल्या स्तरावर गावागावात जाऊन ग्रामपंचायत,शाळा,गाव चावडी येथे जावून गावातील ग्रामस्थ, नागरिकांना सिंचन प्रकल्पाची रचना, धरण व कालव्याचे संरक्षण,कालवा फुटीच्यावेळी घ्यावयाची दक्षता, सिंचन व्यवस्थापनाच्या शिस्तीचे पालन, पाणी वापर, पाणी बचतीचे महत्व, पारंपारिक प्रवाही सिंचनामध्ये पाण्याची बचत करण्याचे उपाय, सुक्ष्म सिंचन पध्दतीचे फायदे, उपलब्ध पाण्यामध्ये घ्यावयाची विविध पिके या विषयी मार्गदर्शन करुन जनजागृती करावी.
श्री. खैरनार म्हणाले की, दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने 16 ते 22 मार्च दरम्यान जल जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. हा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश हा की, नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने वापर करावा, सिंचनासाठी पाणी वापरासंबंधित कायदे व नियमाबाबत लाभधारकामध्ये माहिती व्हावी, सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी यासप्ताहाचे आयोजन करण्यात असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. यावेळी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे श्री.भामरे यांनी पाणी बचत बाबत महत्व विषद केले.
प्रारंभी जलसप्ताहाच्या निमित्ताने जलदिडींत जिल्ह्यातून वाहणाऱ्या नर्मदा,तापी,शिवण,उदई, नागण,नेसू,रंगावली,देहली,गोमाई यानद्याचे पाणी जलकलशात घेवून जलदिडींत पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, जल हे तो कल है, जल संरक्षण, धरती का रक्षण, पाऊस आला मोठा, पाण्याचा केला साठा हे घोषवाक्य सादर करीत जलदिंडीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून सुरु करण्यात येवून पंचायत समिती येथे समारोप करण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातून वाहणाऱ्या विविध नद्यातील पाण्याचे पाणी जलकलशात टाकून जलकलशाचे पुजन तसेच जल प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन श्रीमती खत्री यांनी केले. उप कार्यकारी अभियंता श्रीमती वाघ यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचलन शाखा अभियंता विजय जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नर्मदा विकास विभाग तसेच नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक,नंदुरबार येथील उपअभियंता,कनिष्ठ अभियंता,सहायक अभियंता तसेच कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.