नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील वैंदाणे येथे शेतीच्या वहिवाटवरुन तसेच शेतातील हरभरे मेंढ्यांनी खाल्ल्याने झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या दोन जनाना दुखापत झाल्याची घटना घडली.याप्रकरणी परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आली यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथील डिगंबर विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जयेश वकील यांच्या मालकीच्या मेंढ्यांनी डिगंबर पाटील यांच्या गट क्र.४६१ मधील शेतातील हरभरे खावून नुकसान केले. याबाबत डिगंबर पाटील सांगण्यासाठी गेले असता याचा राग आल्याने डिगंबर पाटील यांना जयेश वकील पाटील याने हातातील विळ्याने डोळ्याजवळ मारुन दुखापत केली. तसेच वकील विठ्ठल पाटील, नाना विठ्ठल पाटील व अमोल नाना पाटील यांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत डिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसऱ्या घटनेत वैंदाणे येथील जयेश वकील पाटील व डिगंबर विठ्ठल पाटील यांच्या शेती वहिवाटीबाबत वाद होता. या वादातून येण्या-जाण्याचा रस्ता बंद केला या कारणावरुन जयेश पाटील यांना विराज डिगंबर पाटील याने चारा भरण्याच्या लोखंडी फावडा डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच डिगंबर विठ्ठल पाटील, दुर्गेश डिगंबर पाटील, प्रदिप मोहन पाटील व मोहन विठ्ठल पाटील यांनी दगडाने व हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जयेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.ज्ञानेश्वर पाटील व ज्ञानेश्वर सामुद्रे करीत आहेत.