नंदुरबार | प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीत मदत मिळणेबाबत व पिक विमा रक्कम त्वरित मिळावा या मागणीचे निवेदन नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकर्यांनी पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी मनिषा खत्री , नंदुरबार तहसीलदार यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी नंदुरबार तालुक्यातील भालेर व परिसरात खरीप हंगाम जवळ जवळ वाया गेला असून पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती असून नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात आमच्या माहितीनुसार सरासरी ४० पैसे आणेवारी लागली असून खरीप हंगामातील उत्पन्नाच्या आधारे शेतकर्याचे भांडवल सुद्धा निघालेले नाही . रब्बी हंगाम तर येणारच नाही . तसेच नंदुरबार तालुक्यातही रोजगार मिळेल असे उद्योगधंदे नाहीत . त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून कोणतेही उत्पन्न नाही अशा बिकट परिस्थितीत दुष्काळ म्हणून शासनाकडून मदत मिळावी तसेच बहुतांश शेतकरी वर्गाने पिक विमा काढला असून रिलायन्स इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीने अल्पशः शेतकर्यांना पिक विमा दिलेला आहे . तरी आपल्या स्तरावरून पिक विमाबाबत कार्यवाही होऊन सर्व विमा धारक शेतकरी यांना पिक विमा लाभ मिळवून द्यावा . जेणेकरून दुष्काळी मदत व पिक विमा मिळून दुष्काळी परिस्थितीत शेतकरी वर्गास आर्थिक मदत मिळेल अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनावर चंद्रशेखर भास्कर पाटील, पी.आर.बागुल,विजय जगन्नाथ पाटील,युवराज पाटील,यमुनाबाई युवराज पाटील, प्रभाकर गोविंद पाटील, साहेबराव दौलत पाटील, विनायक तोंगल पाटील,फकिरा गंगाराम पाटील, राजेंद्र गोविंदा पाटील, किशोर श्रावण पाटील आदींची स्वाक्षरी आहे.