नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथील चेकपोस्टवर असलेल्या सद्भाव कंपनीच्या वजनकाटयामध्ये तब्बल ४०० ते ४५० किलो वजनाची तफावत आढळत असल्यामुळे तेथून जाणार्या वाहनधारकांना ५० ते ६० हजाराचा नाहक दंड भरावा लागत आहे. मात्र, तेथे पाच, दहा हजार रुपये दिले तर वाहनांना सोडून दिले जाते. याबाबत गुजरात राज्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, यांना निवेदन दिले असून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत दोन दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास चेकपोस्टवर आंदोलन करुन तेथे चालणार्या गैरप्रकाराचा आणि भ्रष्टाचाराचा भांडाफोड करु, असा इशाराही देण्यात आला आहे.
याबाबत त्रिशुल ट्रान्सपोर्टचे जीवाभाई गोडानीया, पद्मावती रोडलाईनचे विशालभाई आलानी, त्रिशुल रोडलाईनचे सुभानभाई आगारीया, बालाजी गृप ऑफ ट्रान्सपोर्टचे केवलभाई थानकी, निर्देष ट्रान्सपोर्टचे रुडाभाई यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की, महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या नवापूर (बेडकीपाडा) येथील आरटीओच्या चेकपोस्टवर शासनाने नेमणूक केलेल्या सदभाव कंपनीमार्फत ट्रक मालक आणि चालकांची सर्रास लूट सुरु आहे. येथे बसविण्यात आलेल्या वजन काटा (वे ब्रिज) मध्ये प्रत्येक ट्रकमागे तब्बल चारशे ते साडे चारशे किलोंनी वजन जास्त दाखवले जाते. यामुळे ट्रक मालक आणि चालकांना दंडापोटी पन्नास हजारांहुन अधिकचा फटका बसत आहे. सदर ट्रकचे याच चेक पोस्ट नजीकच्या कुठल्याही खाजगी वजनकाटयावर मापन केल्यास त्याचे वजन सदभाव कंपनीच्या वजनकाट्यापेक्षा चारशे किलोने कमी येत आहे. ही बाब अतिशय संशयास्पद आहे. यामुळे याठिकाणी वाहनधारकांची सर्रास लुट सुरु आहे.
अशाच पद्धतीने ९ तारखेला आमच्या वाहनांची मोजमाप करून आमचे वाहन आरटीओने ताब्यात घेत दंड आकारणी केली आहे. मुळातच ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठीत व्यावसायीक असल्याने वाहनांमध्ये किती माल क्षमता वाहतूक आहे याची आम्हाला जाणीव आहे. वाहन अडवल्यानंतर सदभाव कंपनीच्या कर्मचार्यांसमवेत नियमानुसार फोन वरून पंधरा मिनिटीच्या आत हरकत घेतली. मात्र आमच्या हरकतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपली दंडात्मक कारवाई कायम ठेवली.
त्यांच्या ताब्यात सीसीटीव्ही निगराणीखाली असलेले आमचे वाहनांची त्यांनी कोणत्याही इतर खाजगी वे ब्रिज (वजन काटा) मधून वजन मोजणी करून घ्यावी. ती जास्त निघाल्यास दंडात्मक रक्कम भरण्यास तयार आहोत. मात्र, सदर सदभाव कंपनी आणि आरटीओचे अधिकारी या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. सदभावच्या वे ब्रिज मध्ये वजनात काही फरक नाहीच तर मग ते त्यांच्या ताब्यातील आमच्या वाहनांची इतर वे ब्रिजवर मोजणीसाठी का तयार नाही, हा संशय आहे. या लुटीच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधिक्षक नंदुरबार व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले आहे. मात्र, परिवहन कार्यालयाने याबाबत हात वर केले असून आपण याबाबत न्यायालयात अथवा परिवहन आयुक्तांकडे दाद मागा असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, मुळातच देशात वन नेशन वन टॅक्स लागू आहे. गुजरात सरकारने त्यांच्या राज्यातील सर्व आरटीओच्या चेकपोस्ट बंद केले आहेत. मग महाराष्ट्रातच या चेकपोस्टचा अट्टाहास का? ही लुट कोणासाठी? वाहनांच्या तपासण्या व्हाव्यात यात कुठलेही दुमत नाही. मात्र एखाद्या खाजगी कंपनीला बसवून त्यातून दिला जाणारा हा संशयास्पद त्रास व्यावसायीकांसाठी अतिशय वेदनादायक आहे. त्यामुळे या अन्यायकारी कारभाराच्या विरोधात गुजरात राज्यातील सर्व वाहतुकदार न्यायालयात जाणार आहोत. येत्या एक दोन दिवसात यावर प्रशासनाने योग्य भुमिका न घेतल्यास आम्ही नवापूर येथील बेडकी चेकपोस्टवरच आंदोलन करु असा इशारा दिला आहे. चेकपोस्टवर कशी लुट होते आणि काय गैरप्रकार होत आहेत, वाहनधारकांची कशी लुट केली जाते, याचा आम्ही आंदोलनस्थळी पुराव्यानिशी भांडाफोडदेखील करू, असेही त्यांनी सांगितले.








