धडगाव l प्रतिनिधी-
मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेच्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन, उडीद, ज्वारीसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पावसाच्या तडाख्यामुळे उभ्या पिकांना कणीस उगवले असून ती पिके पाण्यात भिजून सडण्याच्या मार्गावर आहेत. तर आधीच कापून ठेवलेली पिके पुन्हा उगवून नंतर कुजल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे. संततधारेमुळे शेतात पाणी साचले असून जमिनीवर चिखलाचे थर जमा झाले आहेत. अनेक ठिकाणी पिकांची मुळे पूर्णपणे कुजली असून *उत्पादनाची सर्व आशा संपुष्टात आली आहे.
या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सरपंच परिषदेसह स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, नेटवर्कच्या अडचणींमुळे अनेक गावांमध्ये प्रशासनाकडून पिक पाहणी अद्याप झालेली नाही.त्यामुळे नुकसानाचे अचूक मूल्यमापन झालेले नाही. तसेच वनपट्टा हक्कधारक शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाईचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सरपंच परिषदेने धडगाव तालुक्याला तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना सादर केले आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश
“आमचं पीक पावसात कुजून गेलं, आता आमचं जगणंच अवघड झालंय. सरकारने लगेच मदत न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,”
— तेगा पावरा, स्थानिक शेतकरी
“धडगाव तालुक्यातील बहुतांश शेतांमध्ये सोयाबीन, उडीद, ज्वारीसह इतर हंगामी पिके पावसाच्या पाण्यात सडली आहेत. अनेक शेतांमध्ये पिकांची मुळे कुजली असून उत्पादनाची सर्व आशा संपली आहे. त्यामुळे तातडीने तलाठी, कृषी अधिकारी व पंचायत समितीमार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.
अर्जुन पावरा
उपाध्यक्ष धडगाव तालुका सरपंच परिषद सरपंच ग्रा.प. भुजगाव
“शेतकऱ्यांचे सर्वस्व कुजून गेले आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करावा, अन्यथा सरपंच परिषद शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल,”
ॲड. वसंत वळवी अध्यक्ष धडगाव तालुका सरपंच परिषद सरपंच ग्रा.प. झूम्मट








