मोलगी । रविंद्र वळवी
वाढते तापमान व घटत्या भूजल पातळीमुळे
पणी टंचाईची शक्यता आहे. या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी कात्री (ता.धडगाव) ग्रामपंचायत अंतर्गत गाव-पाड्यांवर ३० विहिरींची कामे सुरु झाली. ही कामे रोहयोतून केली जात असून मजूरांचा रोजगारासह संकट टाळण्यासाठी उन्हात संघर्ष सुरु झाला आहे.
प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागातील अनेक गावांमधील पाण्याचे स्रोत देखील प्रतिकुलच आहे. त्यात कात्री गृप ग्रामपंचायत अंतर्गत काही गाव-पाड्यांवर ही परिस्थिती दिसून येते. ग्रामपंचायतीने काही स्रोत उपलब्ध करुन दिले असले तरी कमी पर्जन्यमान अन् वाढते तापमान शिवाय घटत चाललेली भूजल पातळी, अशा कारणांमुळे पाण्याच्या समस्येत दुपटीने भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संभाव्य परिस्थिती उद्॑भवू नये म्हणून प्रशासनामार्फत कात्री ग्रामपंचायत अंतर्गत कात्री, माकडकुंड, पिपरीपाडा व वाहवाणी या गाव-पाड्यांसाठी ३० सिंचन विहीरींना मंजुरी देण्यात आली.
या विहिरींची कामे ही रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु करण्यात आली आहे. कामाला प्रथम सुरुवात केलेल्या १९ विहिरींना मुबलक पाणी लागले असून ते सिंचन व अन्य कामांसाठी आधार ठरू लागले आहे. उर्वरित ११ विहिरींची कामे देखील युद्ध पातळीवर सुरु असून त्यांनाही आवश्यकतेनुसार पाणी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी खत्री यांचे कात्रीकडे विशेष लक्ष
समृद्ध गाव निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विकासाच्या अभिनव संकल्पना कात्री ग्रामपंचायतीत दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी या ग्रामपंचायतीकडे विशेष लक्ष दिले. त्यांचे नेहमी मार्गदर्शन राहिल्यामुळे कृषी विकास, महिला सक्षमीकरण, रोजगार-व्यवसाय याबाबत ही ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत राहिली. विहिरींच्या या कामांसाठी देखील जिल्हाधिकारी खत्री यांनी आवश्यक ते मार्गदर्शन केले, त्यानुसार गटविकास अधिकारी सी.टी.गोस्वामी यांच्या नियंत्रणाखाली सर्व विहिरींची कामे सुरू आहे.