नंदुरबार l प्रतिनिधी
अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरील रहिवाशांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी युरोपियन कमिशनने भेट दिलेल्या तरंगता दवाखानाचा मोठा घसारा झाल्याने गेल्या आठवड्यात त्याच्या तळाला छिद्र पडल्याने गळती लागून दवाखान्यात पाणी शिरले होते. आंबाईपाडा येथे सेवा देण्यासाठी चार जणांच्या पथकासह सदर दवाखाना सदरची घटना घडली. मात्र, हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने दवाखान्याने किनारा गाठल्याने अनर्थ टळला. यामुळे सन २०१५ मध्ये मनिबेलीच्या एका पाड्यावर थांबलेल्या पहिल्या तरंगत्या दवाखान्यानंतर दुसरा तरंगता दवाखानाही आता थांबला आहे.याबाबत आरोग्य विभागाने मोठी गुप्तता पाळली होती मात्र स्थानिक नागरिकांमध्ये ही घटना उघडकीस आली.
नर्मदा काठावरील रहिवाशांना आरोग्यासुविधा पुरविण्यासाठी युरोपियन कमिशनने सन २००५ मध्ये दोन तरंगते दवाखाने नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सुपुर्द केले होते. यामुळे जवळपास ८ ते १० गावे व २५ ते ३० पाड्यांना याच दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा दिली जात होती. मात्र सन २०१५ मध्ये एक तरंगता दवाखाना मनिबेलीच्या एका पाड्यावर नादुरुस्त झाला होता. त्यानंतर तो तसाच राहिला. मात्र त्यानंतर नर्मदा काठावरील रहिवाशांना एक तरंगता दवाखाना व तीन बोटींच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविली जात होती. त्यातच दुसरा तरंगत्या दवाखानाचा देखील मोठा घसारा न झाल्याने तो धोकादायकच बनला होता.
तरंगता दवाखान्यावर कार्यरत पथकातील कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागत होती. त्यातच गेल्या आठवड्यात चार जणांच्या पथकासह सदर दवाखाना आंबाईपाडा येथे सेवा देण्यासाठी गेला असता तळाला पडलेल्या छिद्रामुळे दवाखान्याच्या आत पाणी शिरले. जवळपास गुडघाभर पाणी आत शिरले होते. यामुळे सदर प्रकार कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आल्याने त्यांनी धोकादायक प्रवास करुन तात्काळ किनारा गाठल्याने अनर्थ टळला अन् दुसऱ्या तरंगत्या दवाखान्याचाही अंतिम प्रवास संपला. खरे तर सन २००५ ते सन २०२३ अशा १८ वर्षांच्या कालावधीत याची देखभाल दुरुस्ती होणे अपेक्षित होते. मात्र ते होवू शकले नाही. यामुळे दुसरा तरंगता दवाखानाही थांबला आहे.याबाबत आरोग्य विभागाने मोठी गुप्तता पाळली होती मात्र स्थानिक नागरिकांमध्ये ही घटना उघडकीस आली.