शहादा l प्रतिनिधी
आजच्या काळात प्रत्येकाला शिकून चांगली नोकरी प्राप्त करणे शक्य होत नाही. त्यामुळे कृषी पदवीधारकांनी नोकरीपेक्षा व्यवसायातून उत्पन्नाचा स्त्रोत कसा प्राप्त होईल याचा विचार केला पाहिजे.त्यासाठी अळंबी उत्पादन हा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. पूर्णवेळ लक्ष केंद्रित करून परिश्रमाच्या जोरावर नोकरीपेक्षा अळंबी उत्पादन व्यवसाय चांगले उत्पन्न देऊ शकतो अशी माहिती कृषी व व्यवसाय तज्ञ घनश्याम पाटील यांनी दिली.
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात ‘अळंबी उत्पादनातील संधी व आव्हाने’ या एकदिवसीय उद्योजकता शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल हे होते.
यावेळी श्री.पाटील यांनी अळंबी उत्पादनात येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय याबाबतीत मार्गदर्शन केले. व्यवसाय सुरू करतांना लागणाऱ्या गोष्टी, सरकारी योजना, विक्री,व्यवस्थापन, अशा विविध बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या उद्योजकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पटेल यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.विजय सपकाळ, प्रा. रुपेश पाटील, प्रा. मुकेश कोळी आदींनी केले.