नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच चेक पोस्टवर आजपासून नाकाबंदी सुरु करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची तसेच प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येणार आहे असे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण अफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन वेरिएंटने संपूर्ण जगभरात चिंता निर्माण केली आहे . ओमायक्रॉनचा भारतात संसर्ग झाल्यामुळे भारतात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही अतिशय चिंतेची बाब आहे . कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे . खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न देखील करत आहेत , त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व खाजगी व सार्वजनिक ठिकाणी आता विना मास्क फिरण्यावर बंदी घातली आहे . तसेच मास्क न लावणाऱ्या व शासनाकडुन देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या लोकांना योग्य तो दंड वसुल करुन त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश दिलेले आहेत .
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी कडक निर्बंध लागू करण्याचे निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात येत आहेत . कोरोना विषाणूची लढाई जनतेच्या सहकार्याने जिंकायची आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे . संपूर्ण पोलीस दल आपले कर्तव्य पार पाडून कोरोना सारख्या अदृश्य शत्रूशी लढत आहेत . नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच चेक पोस्टवर आजपासून नाकाबंदी सुरु करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची तसेच प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येणार आहे . प्रत्येक व्यक्तीने कोविडच्या नियमाचे पालन करणे आवश्यक असून लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे . नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक समारंभाला तसेच कार्यक्रमाला प्रशासनाची परवानगी आवश्यक असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे . विना परवानगी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने नोंद घ्यावी . प्रत्येक व्यक्तीने शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे . वारंवार हात धुवा , मास्क वापरा , ६ फुट अंतरठेवा ” या त्रिसूत्रीचा वापर करावा . तसेच मास्कचा वापर न केल्यास दंडाची कारवाई सुरु करण्यात आली असूनही मोहीम काही दिवसात आणखी तीव्र करण्यात येणार आहे . पोलीस अधीक्षक कार्यालय , सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयव नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे येथे नागरीकांचे काही काम / तक्रार असल्यास नागरीकांना कोरोना विषाणूचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य आहे . दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्यास नागरीकांना प्रवेश दिला जाणार नाही तसेच अत्यंत महत्वाचे काम असल्यास नागरीकांनी बाहेर पडावे जेणेकरून विषाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .








