नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा ठराव करून शासनाकडे पाठवावा , अशी मागणी नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी निवेदनातून केली आहे .
याबाबत नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे . त्यात म्हटले आहे की , मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाचशे चौरस फुटातील घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे . यामुळे मुंबई शहरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला लवकरच दिलासा मिळणार असून राज्यात नंदुरबार जिल्हा आकांक्षीत व गरीब जिल्हा आहे . मागील दोन वर्षापासून • कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक परिस्थिती खालावली आहे . त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नंदुरबार नगरपालिकेने शहरातील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा ठराव करून शासनाकडे पाठवावा . यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात दिलासा देण्याचे काम होईल , अशी मागणी नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक आनंद बाबुराव माळी , नगरसेविका सिंधुबाई दशरथ माळी , नगरसेवक चारुदत्त कळवणकर , नगरसेविका संगीता वसईकर , लक्ष्मण माळी यांनी निवेदनातून केली आहे .








