नंदुरबार l प्रतिनिधी
भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी भूमी , वायू ,जल , अग्नी व आकाश ही पंचमहाभूते संरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे . पंच महाभुते संरक्षणासाठी सर्व ग्रामस्थांनी लोकसहभागाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी केले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत बामखेडा त.त , व वडाळी ता. शहादा येथे आयोजित कार्यक्रमात अति .मुख्य कार्यकारी अधिकारी पवार बोलत होते . नंदुरबार जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत निवड झालेल्या पंधरा ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सिमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वीतेसाठी विविध उपक्रम सुरु आहेत . या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी वडाळी व बामखेडा त.त.येथे भेट दिली. यावेळी पवार बोलत होते.ते पुढे म्हणाले की, निसर्गाचे संतुलन व पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करणे , जलसंवर्धन व जलप्रदूषण कमी करणे ,वनराई बंधारे शोष खड्डे यासारखे उपक्रम राबवावेत. ऊर्जा बचतीसाठी सौर दिवे ,एलईडी दिवे यांचा वापर वाढवावा. प्रदूषण रोखण्यासाठी बायोगॅस, सौर चूल यांचा वापर वाढवावा, प्लास्टिक बंदी करावी तसेच सांडपाणी व घनकचरा चे व्यवस्थापन करून गाव स्वच्छ व सुंदर करावे. यावेळी गट विकास अधिकारी घोरपडे यांनीही उपस्थित ग्रामस्थ व शासकीय कर्मचारी यांना अभियान यशस्वी करणेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने उपक्रम राबवून त्यांचे दस्तावेज कसे तयार करावेत याविषयी मार्गदर्शन केले .
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, गटविकास अधिकारी घोरपडे यांनी वडाळी येथे ग्रामस्थ यांना तर बामखेडा तत येथील पी.एम. सी. माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देऊन माझी वसुंधरा अभियानाबाबत माहिती दिली . यानंतर वायू तत्वाअंतर्गत ग्रामस्थामध्ये ई वाहन वापराविषयी जनजागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत बामेखडा व जे.एम. मल्टी सर्विसेस शहादा यांच्या सयुंक्त विद्यमाने ‘ लावण्यात आलेल्या ई- वाहन डेमो स्टॉलची पाहणी करून. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले . यानंतर ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या वृक्ष लागवड , वृक्षांची करण्यात आलेल्या जीओ टॅगीग ,रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामांची पाहणी केली .याप्रसंगी बामेखडा सरपंच मनोज पाटील , महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुन्हे , बांधकाम उप अभियंता पावरा , विस्तार अधिकारी बी. एस. सूर्यवंशी, मनोज देव , जी. पी. कुलकर्णी . शाखा अभियंता एच. बी. भोई, वडाळीचे ग्रामविकास अधिकारी बी.बी . देसले, ग्रामेसवक मनिष रामोळे उप सरपंच उखा भिल , सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आदीसह शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक , वैद्यकिय अधिकारी , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ,कर्मचारी आदीसह ग्रामस्थ .उपस्थित होते.








