नंदुरबार l प्रतिनिधी-
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली जवळ मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसांमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सुरत येथील नवीन सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. रस्त्यावर यापूर्वीच एक टँकर पलटलेला होता. पलटलेल्या टँकरला चुकविण्याच्या प्रयत्नात सुरतहून धुळेच्या दिशेने जाणारी एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या जामनेर आगाराच्या बसवर जाऊन आदळली.
धडक इतकी जोरदार होती की जामनेर आगाराची बस रस्त्याच्या कडेला पलटली आणि त्यानंतर बसला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ आणि आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच बारडोली अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबविण्यात आले.

मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान
सुरत जिल्हाधिकारी तेजस पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले असून, आवश्यकतेनुसार डीएनए चाचणीची मदत घेण्यात येणार आहे.
या अपघातात जामनेर आगाराचे बसचालक घनश्याम राघो बरकले व धुळे आगाराचे बसचालक व्ही. एम. पाटील यांच्या या अपघातात मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या ४२ प्रवाशांपैकी १७ जणांवर बारडोली येथील ग्रामीण रुग्णालयासह अन्य स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर गंभीर भाजलेल्या आणि जखमी झालेल्या सात प्रवाशांना सुरत येथील नवीन सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर विशेष वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातामुळे महाराष्ट्र व गुजरातमध्ये हळहळ व्यक्त होत असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जखमींची नावे
लीलाबेन मानसिंग वसावा (55) – चिंचपाडा
सोपानदेव नामदेव (40) – जळगाव
भरत सीताराम पाटील (73) – सुरत
मित प्रसाद चौहान (7) – चिंचपाडा
ओम प्रसाद चौहान (12) – चिंचपाडा
अयुब यासीन शहा (60) – सुरत
सुरेश मोतीराम तिवारी (67) – सिल्वासा
जगन्नाथ वैजनाथ (60) – सुरत
प्राची प्रसाद चौहान (39) – चिंचपाडा
सरला संतोष जाधव (54)
किरीट कालू गावीत (25)
वसंत नवीन पटेल (42)
राजू सुखदेव सिरसाट (60)
रणवीर जितेंद्र पाटील (7)
मोहित जितेंद्र पाटील (51)
जितेंद्र पाटील (33)
कृष्णा व्ही. थोरात (69)
दामोदर हिराणी पाठक (40)
गिरधर बाबुराव (75)
राजेंद्र भीमराव महाजन (56)
जुबेर झाकीर शेख (32)
गणेश शिवाजी कुंभार (33)
इशिका गणेश कुंभार (34)
रामप्रेमी राजभर (45)
माया गणेश कुंभार (28)
कविता अमृत थोरी (37)
हर्षराज हिम्मत पवार (52)
मुसरा हमद पठाण (24)
हमाद हमद पठाण (8)
सुरेश आत्माराम पाटील (68)
कमल सुरलाल मिस्त्री (55)
हंसराज गुणवंत पवार (42)
जितेंद्र भरत पाटील (39)
दगडू सोनू माळी (42)
चेतन नाना (39)








