नंदुरबार l प्रतिनिधी-
नवापूर तालुक्यातील डायमंड, डॉन (तीन टेंबा) व तस्लीम या तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लू (एव्हियन इन्फ्लूएंझा) रोगाचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पशुपालक, कुक्कुटपालन व्यवसायिक, व्यापारी व नागरिकांनी जैवसुरक्षा प्रणालीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नवापूर तालुका कोंबड्यांचा हब मानला जातो. देशभरातील पहिला बर्ड फ्लूचा नवापूर मध्ये 2006 उद्रेक झाला होता. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू आडून आला होता. आता पुन्हा बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने व्यापारी हवालदील झाला आहे. दरम्यान नवापूर मधील एक लाख 40 हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना दररोज 50 लाखांचा फटका बसणार आहे.
जिल्हाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार, मोठ्या पोल्ट्री फार्मपासून ते परसातील कुक्कुटपालन आणि बाजारपेठेपर्यंत सर्व स्तरांवर खबरदारी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.
पोल्ट्री फार्मसाठी कडक नियम
पोल्ट्री फार्ममध्ये केवळ कामगारांनाच प्रवेश द्यावा, बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करावा. कामगारांनी बूट, कपडे व हात-पाय जंतुनाशकाने स्वच्छ करूनच आत-बाहेर जावे. पिंजरे, खाद्य व पाणी स्वच्छ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन पक्षी आणल्यास किमान ३० दिवस वेगळे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच अचानक मृत्यू, डोळ्यांभोवती सूज, नाकातून स्त्राव, अंडी उत्पादनात घट अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक आहे.
परसातील कुक्कुटपालनातही दक्षता
घरगुती पातळीवर कोंबड्या पाळणाऱ्यांनी पक्षी बंदिस्त ठेवावेत, वन्य पक्ष्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये. आजारी किंवा मृत पक्षी उघड्यावर टाकू नयेत; त्यांना पुरून नष्ट करावे. परिसराची स्वच्छता राखणे व कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे.
बाजारपेठेत निर्जंतुकीकरण अनिवार्य
जिवंत कुक्कुट बाजारात दररोज निर्जंतुकीकरण करणे, पिंजरे स्वच्छ ठेवणे आणि विक्रेत्यांनी मास्क व ग्लोज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मांस विक्री ठिकाणी स्वच्छता राखून कचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाचा इशारा
संशयित किंवा मृत पक्षी आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
बर्ड फ्लूचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने वागून जैवसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी, नंदुरबार तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. संजय खाचणे यांनी केले आहे.








