नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरील ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत मॅनेजरचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर रमेश जाधव (वय २५, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) हा ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे मॅनेजर म्हणून कार्यरत होता. ११ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास काही संशयित हॉटेलमध्ये घुसले आणि जुन्या वादाच्या कारणावरून सागर जाधव याच्यावर हल्ला चढविला.
संशयितांनी “हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?” असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर कैलास पाडवी याने लाकडी दांड्याने सागर जाधव याच्या पोटावर, हातावर व डोक्यावर जबर मारहाण केली, तर विक्की राजपूत याने स्कॅनर मशीन डोक्यावर फेकून मारले. इतर आरोपींनीही हाताबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या भीषण हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी कुणाल मराठे यांच्या फिर्यादीवरून विक्की राजपूत, कैलास पाडवी, दीपक ठाकरे, निलेश ऊर्फ बंटी चौधरी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.








