नंदुरबार | प्रतिनिधी
विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगर शाखेतर्फे नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या साडे ८०० हून अधिक गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत सुंदर्दे जि.प. शाळेतील १८५, गुजरजांभोली ११६, नळवा १३५, पातोंडा १२९, राजापूर ९७ तसेच व्याहूर जि.प. शाळेतील ८६ विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, कंपास आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
सदर शालेय साहित्याचे वाटप संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्व मानव रुहानी केंद्र नंदुरबार शाखेचे सर्व सेवादार उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाला मोठी मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. तसेच या सामाजिक उपक्रमासाठी विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगर (हरियाणा) आणि परमसंत बलजितसिंह महाराज यांचे त्यांनी आभार मानले.








