नंदूरबार l प्रतिनिधी
बहुचर्चित शासनाची आनंदाची शिधा या योजनेचा अक्कलकुवा तालुक्यात पुर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.त्यामुळे शासनाच्या या योजनेने गरिबांची थट्टा केली असुन गरिबांची दिवाळी गोड होण्या ऐवजी आनंदाच्या शिधाच्या प्रतिक्षेतच जात आहे.असे प्रतिपादन आ.आमश्या पाडवी यांनी केले.
अक्कलकुवा तालुक्यात एकुण 201 स्वस्त धान्य दुकाने आहेत.त्यात अंत्योदयचे 18862 तर प्राधान्य क्रमाचे 22004 असे एकूण 40866 शिधापत्रिकाधारक आहेत त्यांना आनंदाची शिधा वाटपासाठी एकूण 40,866 किलो साखर तर तेवढेच पामतेल, रवा, चनाडाळ याची आवश्यकता आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत संबंधित यंत्रणेकडून 31 हजार 800 लिटर पामतेल, 19 हजार 500 किलो रवा, तर 24 हजार 750 किलो चनाडाळ प्राप्त झाली आहे.त्यापैकी चनाडाळ ही शुक्रवारी दुपारी गोडाऊनला आल्याने ती रेशन दुकानदारांपर्यंत पोहचलेली नव्हती.
तालुक्यातील काही रास्त धान्य दुकानांत पाम तेल,रवा,चनाडाळ पोहोच करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप पर्यंत साखरेची उपलब्धता दुकान दारांना न झाल्याने तालुक्यातील शिधा पत्रिका धारक हे दिवाळीच्या पर्वात आनंदाच्या शिधा पासुन वंचित झाले आहेत.
याबाबत आ. आमश्या पाडवी यांनी सांगितले की, बहुचर्चित शासनाची आनंदाची शिधा या योजनेचा तालुक्यात पुर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.शासनाच्या योग्य नियोजना अभावी तालुक्यातील आदिवासी गरीब नागरिकांना आता पर्यंत आनंदाची शिधा मिळालेला नाही.रास्त दुकान धारकांना केवळ पामतेल ,रवा याचेच वितरण करण्यात आले आहे.चणाडाळ आणि साखर या दोन्ही वस्तु अद्याप पर्यंत देणेच बाकी आहे त्यामुळे शासनाच्या या योजनेने गरिबांची थट्टा केली असुन गरिबांची दिवाळी गोड होण्या ऐवजी आनंदाच्या शिधाच्या प्रतिक्षेतच जात आहे.असे विधान परिषद सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले.








