नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील नागन प्रकल्प केळी गावाजवळील रस्त्यावरील पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू झालेल्या परिवाराला आमदार आमश्या पाडवी यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी परिवार मदतीपासून वंचित आहे असे सांगत परिवाराचे सांत्वन करीत दोषींवर कारवाईसह मदत मिळवून देण्याच्या आश्वासन दिले.
नवापूर तालुक्यातील केळी केवडीपाडा दरम्यान नागन प्रकल्पाचे पाणी रस्त्यावर येऊन पाण्यात बुडून मयत झालेल्या महिलेच्या पीडित कुटुंबाला आमदार आमश्या पाडवी यांनी भेट घेऊन सांत्वन केली. सदर पीडित कुटुंबाला अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नसून प्रकरणात बांधकाम विभाग व ठेकेदार सुमनिक कन्स्ट्रक्शन दोषी आढळल्यास कारवाईची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार आमश्या पाडवी यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण नागणप्रकल्पा अंतर्गत भरडू गावाजवळ बांधण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे केळी, केवडीपाडा हे गाव स्थलांतरित झाले असून नव्याने पुनर्वसन झालेल्या केळी गावातील नागरिकांना शेतशिवारात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर धरणाचे पाणी येऊन रस्ता पाण्याखाली जात असल्याने प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पूल बांधण्यात आला आहे. परंतु धरणातील पाण्याच्या पातळी नुसार सदर पुलाची उंची कमी असल्याने धरणातील पाण्यामुळे रस्ता पाण्याखाली जातो.
या ठिकाणी आतापर्यंत अनेक घात अपघात झाले आहे. गेल्या काही दिवसात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा पाण्यात तोल जाऊन बुडून मृत्यू झाला होता. सदर अपघात बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार सुमणिक कन्स्ट्रक्शन कंपनीने पूलाचे काम व्यवस्थित केले नसल्यामुळे गावातील नागरिकांचा जीव जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दोषी बांधकाम अधिकारी व सुमानिक कन्स्ट्रक्शन कंपनी ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कारण धरणाचे पाणी ओवर फ्लो झाल्यास सदर पूल व रस्ता पाण्याखाली जाऊ शकतो हे माहीत असताना देखील पुलाची उंची कमी करून निकृष्ट दर्जाचा पूल व रस्ता तयार केल्याने येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मयत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती; परंतु बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार सुमाणिक कन्स्ट्रक्शन कंपनीने व नागण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यानींही नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने नागरिकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. केळी व केवडीपाडा गावातील नागरिकांची विधान परिषदेचे शिवसेना आमदार आमश्या पाडवी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. व या प्रकरणांमध्ये दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधान परिषदेमध्ये मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे








