शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील केळी पीक विकत घेऊन त्याचा मोबदल्यात दिलेले धनादेश बँकेत वटत नसल्याने अक्कलकुवा येथील केळी व्यापारी नौशादअली अहमदअली मक्राणी यास येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांच्या न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवत प्रत्येक शेतकऱ्याला मूळ रक्कमेच्या दुप्पट व खर्चासह तीन महिन्याच्या आत रक्कम परत करण्याची व प्रत्येक प्रकरणात तीन महिने साध्या कैदेशी शिक्षा सुनाविली आहे.
विशेष म्हणजे व्यापार्यांच्या अश्या व्यवहाराने शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांचेवर आत्महत्येची वेळ येऊ शकते अशी टिप्पणी न्यायालयाने निकाल देतांना केली आहे. फिर्यादी तर्फे ॲड. ब्रजेश जायसवाल यांनी काम पाहिले.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि, परीवर्धा ता. शहादा येथील सुरेश सुदाम पाटील व तऱ्हाडी ता. शहादा येथील संदीप काशिनाथ पाटील या दोन शेतकऱ्यांनी मे २०१७ मध्ये त्यांच्या कोठली ता. शहादा शिवारातील शेतात लागवड केलेल्या केळी पिकाची अक्कलकुवा येथील नौशादअली मक्राणी या केळी व्यापाऱ्यास विक्री केली होती. मे २०१७ च्या पहिल्या आठवड्यात सदर व्यापार्याने शेतात येऊन केळी पिक कापून नेले होते.
सुरेश पाटील यांना सदर व्यापार्याने दोन लाख ११ हजार आठ शे रुपये व संदीप पाटील यांना एक लाख ११ हजार ९५ रुपये मोबदला द्यावयास हवा होता. सदर व्यापारी चार- पाच वर्षांपासून परिसरातील केळी विकत घेण्याचा व्यवसाय करीत असल्याने त्याला सदर शेतकरी ओळखत असल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे देण्याच्या बोलीवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. मुदत निघाल्यावर शेतकऱ्यांनी पैश्यांची मागणी केली असता. सदर व्यापार्याने सुरेश पाटील यांना एक- एक लाख रुपयांचे दोन धनादेश व संदीप पाटील यांना एक लाख रुपयांचा एक धनादेश असे तीन धनादेश दिले होते. व उर्वरित रक्कम लवकरच देतो अशी बोली केली होती.
सदर धनादेश शेतकऱ्यांनी बँकेमध्ये वटविण्यास टाकले असता सदर व्यापार्याच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश वटू शकले नाही. शेतकऱ्यांनी सदर व्यापार्याकडे पैश्यांची मागणी केली असता तो टाळाटाळ करु लागला, परिणामी व्यापार्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. परिणामी त्यांनी न्यायालयात धाव घेऊन न्यायाची मागणी केली होती.
सदर व्यापारी नौशादअली अहमदअली मक्राणी याच्या विरोधात शहादा येथील प्रथम वर्ग न्यायालयात दोन शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या तीन धनादेश अनादर प्रकरणी तीन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले होते. या तीनही प्रकरणात न्यायाधीशांनी तीन वेगवेगळे निकाल सुनाविले आहेत. सुरेश पाटील या शेतकऱ्याच्या प्रकरणात प्रत्येक धनादेशाच्या रक्कमेच्या दुप्पट रक्कम म्हणजे दोन लाख रुपये व खर्च १० हजार रुपये असे दोन लाख दहा हजार रुपये व दुसर्या धनादेशाचेही दोन लाख १० हजार रुपये असे एकूण चार लाख २० हजार रुपये आणि संदीप पाटील या शेतकऱ्याला देण्यात आलेल्या धनादेशाच्या बदल्यात दोन लाख १० हजार रुपये अशी सर्व सहा लाख ३० हजार रुपयांची रक्कम तीन महिन्याचे आत देण्याचे आदेश दिले आहेत.
त्यासोबतच प्रत्येक प्रकरणी तीन महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनाविली आहे. रक्कम वेळेच्या आत न दिल्यास परत तीन महिन्याची शिक्षा सुनाविली आहे. न्यायालयाच्या या निकालाने शेतकऱ्यांना दिलासा तर मिळालाच आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करू पाहणाऱ्या व्यापाऱ्यांनाही इशारा मिळाला आहे.









