नंदुरबार l प्रतिनिधी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहादा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर एक बैल ठार झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पाच ते सहा घरांचे पत्रे उडाले असून एक वीज रोहित्र कोसळले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की,शहादा तालुक्यातील वडगाव शहाणा गावातील वन जमीन जंगल परिसरात शेतामध्ये झोपडी करून राहत असलेले दयाराम भिल (वय 54) रा. खेतिया यांच्या झोपडीजवळ वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान तेथेच झोपडीजवळ बांधलेला एक बैल देखील विजेमुळे ठार झाला आहे.
दरम्यान नवापूर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे देवळीपाडा निमदर्डा परिसरात विजेचा ट्रान्सफर कोसळून नुकसान झाले आहे.
तसेच देवळीपाडा पांढरफळी, निमदर्डा, सोनखांब, तिलासर या गावांमध्ये रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. तसेच योगेश धर्मा गावित, वेल्जी काकडा गावित, निशार गावित राहणार सोंनखांब व शांत्या जेरमा गावित राहणार निमदर्डा,
या व्यतिरिक्त पाच ते सहा गावातील नागरिकांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पाहणी करून काही ठिकाणी पंचनामे केले आहे, तर ज्या ठिकाणी पंचनामे झाले नसेल त्या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसाचा जून महिना संपत आला असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. ठराविक भागांमध्ये पाऊसाने हजेरी लावल्याने दिवसेंदिवस पेरण्या लांबत असल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडत आहे.