नंदुरबार l प्रतिनिधी
पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे रोपवेची निर्मिती करण्यासाठी 15 कोटीची तरतूद केली असल्याचे माहिती आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी म्हणाले की, आदिवासी बांधवांना यापुढे खावटी अनुदानाऐवजी स्वत:च्या पायावर उभे करुन सक्षम करण्यासाठी व रोजगार निर्माण करता यावे यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ११ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना खावटी अनुदान वाटपाचे उद्दिष्ट होते. १० लाख ५० हजाराहून अधिक आदिवासी बांधवांना याचा लाभ देण्यात आला आहे. असे असले तरी यापुढे आता आदिवासी बांधवांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व रोजगार निर्माण करण्यासाठी कुक्कटपालन, शेळीपालन, मत्स्य व्यवसाय यासारख्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्मिती होवून स्थलांतर रोखण्यास देखील मदत होणार आहे. दरम्यान, सिकलसेलबाबत बोलतांना त्यांनी सिकलसेलला रोखण्यासाठी लग्न पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान सिकलसेलसाठी धडगाव तालुक्यातील असली येथे केंद्र निर्मिती करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने ११० कोटींचा वाढीव निधी मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. ६० ते ७० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती व्हावी यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे ॲड.पाडवी म्हणाले.धडगाव तालुक्यातील उंच शिखर असलेल्या अस्तंबा येथे रोपवेची निर्मिती करण्यासाठी 15 कोटीची तरतूद केली असल्याचे माहिती आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिली.त्यामुळे भविष्यात नागरिकांना रोपवे द्वारे अस्तंबा येथे दर्शन करता येणार आहे. पर्यटस्थळांना चालना मिळाल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे काही प्रमाणात स्थलांतर थांबण्यास मदत होईल असेही. ॲड.पाडवी म्हणाले.