नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतची सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. आज जिल्ह्याचा पारा ४३.८ सेल्सिअस इतका नोंदवला गेला आहे. उन्हाचा जनजीवनावर परिणाम होतांना दिसत असुन रस्त्यावर दुपारच्या सत्रात शुकशुकाट पहावयास मिळत आहे. उकाड्या पासुन संरक्षणासाठी नागरीक टोपी स्कार्फ, रुमाल सारख्या वस्तुचा सहारा घेत असुन शितपेय, रसवंतीवर देखील गर्दी होतांना दिसत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या तापमान मापक यंत्रात सदरची ४३.८ इतकी नोंद झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सूर्य कोपला आहे. काल मार्च व एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उष्णतेपासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानाचा कमाल पारा ४० अंशाहून अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यातच आता हा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. एप्रिलमध्ये कधी नव्हे ते आज तब्बल ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने यंदाचा उन्हाळा हा गेल्या वर्षापेक्षा अधिक तापदायक होईल, अशी शक्यता आहे.
गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे नागरिक गरजेपुरतेच बाहेर पडले. मात्र यंदा कार्यालये सुरू झाली आहेत. यामुळे दिवसादेखील नागरिकांची वर्दळ असते.असे असले तरी जीवाची लाहीलाही करणाऱ्या ऊन्हात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.