नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी गावाच्या विकास कामांमधून ठेकेदाराकडून अभियंत्यांनी 43 लाख 75 हजार रुपयांची लाच मागून चार लाख रुपये टोकण रक्कम घेताना एसीबीने पकडल्यानंतर रात्री उशिरा कार्यालय व घरांचे झाडाझडती घेतल्याची माहिती प्राप्त झाली असून तिघांना २६ मार्च पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेलं भगदरी गाव राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीदेखील देण्यात आला आहे. जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन इमारत बांधणे, रस्ता सुधारणा, रस्ता जलनिस्सारणाची कामे यासह इतर 45 कामांचे आदेश देण्यात आले होते. सदर कामांच्या मोबदल्यात शासकीय ठेकेदाराला तब्बल आठ कोटी 45 लाख 89 हजार रुपये एवढी देयक आहे. त्यापैकी सदर विभागाच्या उप अभियंता सुनील पिंगळे व शाखा अभियंता एस.बी. हिरे यांनी ठेकेदाराचे 84 लाख रुपये राखुन ठेवले आहे. त्या मोबदल्यात शासकीय ठेकेदाराकडून ४३ लाखाच्या लाचेची मागणी केली होती. याचा पहिला हप्ता ४ लाख रुपये टोकण घेताना अक्कलकुवा पंचायत समितीमधील उप अभियंता सुनील पिंगळे व शाखा अभियंता एस बी हिरे यांच्यासह एक पंटरला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.दरम्यान काल रात्री उशिरा अटक केलेल्या पथकाद्वारे सदर अधिकाऱ्यांच्या कार्यालय व घराची झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांकडून आणखी किती रक्कम हस्तगत केली आहे याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप बोलणे टाळले असले तरी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील विकास कामांच्या मोबदल्यात अधिकाऱ्यांकडून एवढी मोठी रक्कम लाच मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान अक्कलकुवा येथे उप अभियंता सुनील पिंगळे व सहाय्यक अभियंता एस.बी.हिरे व एका पंटरला २६ मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.








