नंदूरबार l प्रतिनिधी
खांडबारा ता. नवापूर येथे डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार Cillage based Area Development Programme (CADP) सिलेज प्रकल्पाअंतर्गत आयोजित “आंबा उत्पादक परिषद” संपन्न झाली.खांडबारा परिसरातील ६०० एकरावर आंबा लागवड करण्यात आली आहे.
या परिषदेत शश्रीधर देसले उद्यानविद्या तज्ञ, विभागीय विस्तार केंद्र, धुळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवी जीवनाच्या तीनही गरजा कृषी क्षेत्रातून पूर्ण केल्या जातात. शेतीचे तंत्रज्ञान, शेती करण्याच्या पद्धती, पिके ह्यामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. वातावरणाचा प्रभाव फळबागावर होताना दिसून येत आहे. आपल्या आंबा फळबागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. योग्य पद्धतीने मशागत, खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन वेळेवर करून शेतकऱ्यांनी आपल्या आंबा फळबागेचे उत्पादन वाढवावे यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतिपादन श्री. देसले यांनी केले.
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरातून शेती उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आंब्याचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान याबाबत शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून “आंबा उत्पादक परिषद” एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार येथील विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी प्रास्ताविकात दिली.
आंब्यामध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यात तुडतुडे, मावा या रस शोषणारी किडी, फळमाशी, पिठ्याढेकुण, करपा, फांदीमर यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्यासाठी जैविक किटकनाशक व बुरशींनाशके मेटारायझम, वर्टीसिलीअम, निंबोळी अर्काचा वापर करावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील विषय विशेषज्ञ पी. सी. कुंदे यांनी मार्गदर्शनात केले.
आंब्यामध्ये आरोग्यदायी आणि पोषणासाठी अनेक आयुर्वेदिक घटक आहेत. आंब्यातील जीवनसत्व तसेच आंब्यातील अनेक औषधी गुणधर्म विविध रोग निवारणासाठी आहे. आंब्याची काढणी आपण चांगल्या प्रकारे करून विक्रीव्यवस्थेसाठी प्रतवारी केले पाहिजे. उर्वरित फळे प्रक्रियेसाठी वापरली गेली पाहिजे. आंबा पिकापासून ज्यूस, पल्प, आंबा वडी, फ्रोझन पदार्थ तयार करून विक्री करू शकतो याबाबत कृषि विज्ञान केंद्र, नाशिक येथील उद्यानविद्या विशेषज्ञ हेमराज राजपूत यांनी मार्गदर्शन केले.
कमी होत जाणारी जमीनधारणा, पावसाची अनियमितता अशा अनेक समस्या कोरडवाहू शेतकऱ्यांना जाणवत आहेत. त्यातून उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी मोलमजुरी तसेच स्थलांतर सारख्या पर्यायाचा अवलंब करीत असत. उपलब्ध जमिनीच्या सुयोग्य वापरातून, हवामान बदलाच्या काळातली शाश्वत उत्पन्न देण्यासाठी फळबाग एक चांगला पर्याय ठरू शकतो हे लक्षात घेऊन डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या राष्ट्रीय कृषि नवोन्मेषी प्रकल्पाच्या माध्यमातून “आंबा लागवड” करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार योग्य शेतकऱ्यांची निवड करून आंबा लागवड करण्यात आली. आंबा लागवडीच्या यशस्वी प्रयोगानंतर नाबार्डच्या माध्यमातून खांडबारा परिसारातील ६०० एकरावर आंबा लागवड झाली आहे.
जास्तीच्या उत्पन्नासाठी फळबाग लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे; मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीचा अभ्यास करून उत्पादन काढले तरच फळबाग फायदेशीर ठरते. फळबागांचे उत्तम व्यवस्थापन करून नवापुर परिसरातील शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत ही जमेची बाजू आहे असे वक्तव्य कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी केले.
फळबागेतून उत्तम आर्थिक फायदा मिळतो त्यामुळे पारंपरिक शेतीला जोडून फळबाग लागवड करण्याचे नियोजन केल पाहिजे, ४ वर्षापर्यंत आपण संगोपन केले पाहिजे त्यानंतर आपल्या परिवाराचे संगोपन फळबाग करेल असे प्रतिपादन डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील यांनी केले.
यावेळेस, डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबारचे विकास अधिकारी अनिल पाटील, सिलेज प्रकल्पातील विकास सहयोगी राकेश खलाने, योगेश पाडवी, संदिप कुवर तसेच उमवि-सिलेज प्रकल्पाचे पवन गावित, दिनेश राठोड, राहुरी येथी शेळी सुधार प्रकल्पाचे पशुधन सह्हायक गौरव घोलप, अजय गुलदगड उपस्थित होते. तसेच या परिषदेला परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी, महिला उपस्थित मोठ्या संख्येने होते .
यशस्वी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले.
यशस्वी आंबा उत्पादकांनी “आंबा उत्पादक परिषद” मध्ये मान्यवरांच्या “सन्मानपत्र” देऊन गौरविण्यात आले. आंब्यासारख्या उंच झाडांवर फवारण्यासाठी बॅटरी चलित स्प्रेअर तसेच फळझाडाखाली आळे तयार करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या “फोर्क” चे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.