नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस तापमान जास्त राहील अशी माहिती कृषि विज्ञान केंद्राचे कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुग, बाजरी, मुग, तीळ, आदी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. त्यामुळे पिकांना उष्माचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. फळ झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा. यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्त वेळ टिकून राहील. फळधारणा अवस्थेत
असलेल्या आंबा, केळी व पपईसारख्या फळांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी पिशवीने फळे झाकून घ्यावीत. वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. दरम्यान पुढील दोन दिवस विशेषतः दुपारी ११ ते ४ या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान ठेवण्याचा प्रयत्न कारावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेऊन मुबलक प्रमाणात पाणी प्यावे, अशी माहिती नंदुरबार जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र यांनी दिली आहे.