नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील करंजी ओवरा भागातील धर्मेश अशोक पाटील यांच्या शेतात शनिवारी दहा वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात भीषण आग लागली शेजारी शेतात उसाची पाचट जळत असल्याने आगीचे लोण शेतात पोहोचल्याने भीषण आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
12 एकरांतील ऊस आगीत जळून खाक झाला. यात धर्मेश अशोक पाटील या शेतकऱ्याचे 12 लाखांचे नुकसान झाले आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना आग विझविण्यासाठी मोठी दमछाक करावी लागली.शेतात हवेचा वेग प्रचंड असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोण वरपर्यंत जात होते. ऊसतोड मजूर व आजूबाजूतील शेतकऱ्यांनी ऊसाच्या पात्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात लागल्याने त्यांचे प्रयत्न देखील अपयशी ठरले. त्यादरम्यान नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
नवापूर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले यात दोन टँकर पाणी लागले आहे. आग लागताच तात्काळ सतर्कतेच्या दृष्टीने घटनास्थळी वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.आग विझवण्यासाठी नगरसेवक आरिफ बलेसरीया, माजी नगरसेवक दर्शन पाटील, अल्पेश पाटील, दिपेश पाटील, संदिप पाटील, धर्मेद्र पाटील आदींनी घटनास्थळी मदत केली.