नंदुरबार | प्रतिनिधी
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने वनहक्क कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसह विविध मागण्यांसाठी विसरवाडीहून ४० किमी.पायीमोर्चा नेत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर बिर्हाड आंदोलन करण्यात आले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली.दरम्यान रात्री १ वाजेच्या सुमारास लेखी आश्वासन मिळाल्याने अखेर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या हजारो कार्यकर्त्यांनी वन दावेदारांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.त्यात प्रशासन त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत विसरवाडीहून पायीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.दिवसभर कडाक्याच्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या सुरूच होता.सायंकाळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व संबंधित विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत सत्यशोधकच्या शिष्टमंडळाशी विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर सुरुवातीला लेखी आश्वासन देण्यात आले.मात्र त्यात त्रुटी आढळल्याने सत्यशोधकच्या शिष्टमंडळाने सदरचे लेखी आश्वासन नकार दिला.यामुळे त्यात दुरूस्ती करुन पुन्हा नव्याने रात्री १ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची स्वाक्षरी असलेले लेखी आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्याहस्ते देण्यात आले.लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. लेखी आश्वासनात सत्यशोधकच्या विविध मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सूचना देण्यात येतील व मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करण्यात येतील असे म्हटले आहे.यावेळी रामसिंग गावित, जगन गावित, होमाबाई गावित, किशोर ढमाले, दिलीप गावित, रणजित गावित, रामा गावित, नकट्या गावित, जोत्या गावित, शितल गावित, जेठा गावित, कांतीलाल गावित, विक्रम गावित, साजूबाई गावित, सिंगा वळवी, मंगा गावित, रमेश गावित, उत्तम गावित, रंग्या कोकणी, भिलक्या गावित, शितल गावित, जेवाबाई गावित, हिरामण महाले, जेत्या गावित आदींसह हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.