नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील चित्रपटगृहे, सिनेमा हॉल, नाटयगृहे १०० टक्के क्षमतेने सुरु करण्यास जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परवानगी दिली असल्याचे आदेश आज काढण्यात आले.
या आदेशात म्हटले आहे कि, राज्यात कोविड विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव पाहता सर्वत्र कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत असल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने संपूर्ण राज्यासाठी प्रतिबंधात्मक निर्बंध लागू केले आहेत. मागील दोन वर्षापासून कोव्हिड -१९ मुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे चित्रपटगृहे, सिनेमा हॉल नाटयगृहे बंद असल्याने तसेच सद्यस्थितीत ५० टक्के क्षमतेने सुरू असल्याने सदर व्यावसायिकांना मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी चित्रपटगृहे, सिनेमा हॉल ( मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रिन सह ) , नाट्यगृहे यांच्या वेळेत वाढ होवून मिळणेबाबत तसेच १०० टक्के क्षमतेने नियमितपणे सुरू करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयात आतापर्यंत १८ वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ७४.७१ टक्के लसीचा पहिला डोस व ४९.०७ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे . जिल्हयात आज रोजी कोव्हिड -१९ चे एकूण १४ रूग्ण आहेत . सर्व रुग्णांना सौम्यस्वरूपाचे लक्षणे असल्याने वैद्यकीय देखरेख खाली गृह अलगीकरण करण्यात आले आहे . जिल्हयांचा दरदिवसाचा पॉझीटीव्हीटी दर १० टक्के पेक्षा कमी आहे आणि रिकव्हरी रेट ९८ टक्के आहे . आजच्या दिवसाला रूग्णालयात एक ही कोव्हिड -१९ चा बाधित रूग्ण दाखल नाही . यास्तव जिल्हयातील उक्त आस्थापना यांना चालना मिळणेसाठी त्यांच्यावरील निर्बंध शिथिल करणे आवश्यक आहे.त्यामुळे नंदुरबार उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व चित्रपटगृहे, सिनेमा हॉल ( मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रिन सह ) , नाटयगृहे , हे ५० टक्के क्षमतेऐवजी १०० टक्के क्षमतेने नियमित वेळेनूसार सुरू ठेवण्यासाठी याद्वारे मुभा, सुट देण्याबाबत आदेशित करीत आहे .
केंद्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देशाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेले आदेशातील सर्व निर्देश , सूचना , अटी व शर्तीचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक असेल . कोविड -१९ साथरोग संदर्भाने शासनाचे आदेश , जिल्हा प्रशासनाचे आदेशांमधील अटी , शर्ती , दंडाबाबत निर्देशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती , आस्थापना व शासकीय निमशासकीय विभागांना बंधनकारक पालन करणे सक्तीचे असेल असे जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मनिषा खत्री यांनी आदेशात म्हटले आहे.