शहादा | प्रतिनिधी
जिल्ह्यात पपई व केळी या फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या फळ पिक उत्पादक शेतकर्यांवर अन्याय होत आहे. एकत्रित आल्यावर अनेक समस्यांवर तोडगा शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन अन्यायाला वाचा फोडणे गरजेचे आहे. या फळ पिकांच्या अडचणी व संधीचा अभ्यास करून लवकरच शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा फळ बागायतदार संघाचे मुख्य प्रवर्तक अभिजित पाटील यांनी केले.
तालुक्यातील प्रकाशा येथील अन्नपूर्णा माता मंदिराचा प्रांगणात हजारो शेतकर्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा केळी, पपई फळ बागायतदार संस्थेतर्फे शेतकर्यांवर होणारा अन्याय व पुढील ध्येय धोरण निश्चितीसाठी किसान मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, नंदुरबार जिल्हा केळी, पपई फळ बागायतदार सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक अभिजित पाटील, बुधाभाई पाटील, हरिभाई पाटील, भगवान पाटील, पुरुषोत्तम चव्हाण, हिरालाल पाटील, मुकेश पाटील, डॉ. उमाकांत पाटील, किसान मोर्चाचे घनश्याम पाटील, संजय चौधरी, महेंद्र चौधरी आदींसह संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते.केळी, पपईच्या रोपांचे विधिवत पुजा करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री.पाटील म्हणाले की, शेतकर्यांना समृद्ध व्हायचे असेल तर संघटित होणे गरजेचे आहे. शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकर्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळेत व कमी खर्चात जास्त प्रमाणावर उत्पादन कसे मिळवता येईल यासाठी त्यांना दिशा देण्याची गरज आहे. फळ बागायतदार शेतकरी संघटित झाल्यास त्याचा नक्कीच फायदा भविष्यात होईल. यासाठी फळ बागायतदार शेतकर्यांनी एकत्र यावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
स्क्रीनवर सविस्तर माहिती
केळी व पपई पीकाचे व्यवस्थापन याबाबत अनिल पाटील यांनी जमिनीची निवड मशागत, हवामान, रोपांची निवड, पाणी, खत, पिकांवरील रोग व किड, पक्व पीक काढणीपूर्व, बाजारमूल्य व्यवस्थापन, काढणी पश्चात जमिनीचे व्यवस्थापन व संगोपन व तंत्रज्ञान, केळी व पपईपासून बनवली जाणारी मूल्यवर्धित उत्पादने याबाबत माहिती दिली.
योगेश नांद्रे यांनी शेती व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. भांडवल, खर्च, उत्पादन, विपणन आणि बाजारपेठ, उत्पन्न आणि लेखापरीक्षण, क्रेडिट, जबाबदारी आदींबाबत माहिती दिली. यावेळी प्रदीप लाटे, श्री.दहातोंडे, किशोर हडपे, मोतीलाल पाटील, डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
जिद्दीला सलाम, शेतकर्यांचा सत्कार
प्रेरणेने शेतकरी घडेल. यासाठी मोहिदा (ता.शहादा) येथील पपई उत्पादक शेतकर्यांचा घामाचा पैसा दिल्लीस्थित एका व्यापार्याने बुडवून पलायन केले होते. त्याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, श्री.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व शेतकर्यांच्या चमूने दिल्ली गाठली. तीन दिवस मुक्कामानंतर मोठ्या हिमतीने व्यापार्यास ताब्यात घेऊन शहादा गाठले. शेतकर्यांचा या जिद्दीला सलाम व प्रेरणेतून शेतकरी घडेल म्हणून प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.एस.पाटील यांनी केले. आभार हरीभाई यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातून तसेच लगेच या गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.