नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक (12 वी) 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 तर 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत माध्यमिक शालांत (10 वी) परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात जिल्ह्यात 4 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते 18.00 वाजेपावेतो परिक्षेसाठी संबंधीत नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक वापरासाठी या कालावधी मनाई असेल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.








