नंदुरबार | प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या नर्मदा नदीच्या बॅकवॉटर वरील सावर्या दिगर पुलाच्या अर्धवट कामाचा जाब विचारण्यासाठी नागरिकांचा धडगाव तहसील कार्यालयाला घेराव घातला.दरम्यान २ मार्चला नर्मदा विकास प्राधिकरणसह सर्व संबंधित अधिकारी माहिती देण्याचे आश्वासन यावेळी गावकर्यांना देण्यात आले.अर्धवट पुलाचे बांधकाम सुरू न झाल्यास १० मार्चला नागरिकांकडून जलसमाधीचा इशारा यावेळी गावकर्यांतर्फे निवदनाव्दारे देण्यात आला.
धडगाव तालुक्यातील सावर्या दिगर, भमाना, वरवाली, सादरी, भाबरी उडद्या, भादल या गावांना जाण्यासाठी नर्मदा नदीवरील बॅकवॉटर मुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे २००५ साली भिंगारे समितीच्या सर्वेक्षणातून या गावांचे पुनर्वसन न करता नदीवर पूल बांधून दिल्यास दळणवळणाची सोय होईल असे सुचविण्यात आले होते त्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापूर्वी सावर्या दिगर पुलाच्या कामाला सुरुवात झाली खरी परंतु २०२२ उजाडल्यानंतर ही हे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे येथील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण होते.सदर पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी नागरिकांकडून आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून धडगाव तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला. याबाबत प्रशासनाला जाब विचारल्यानंतर २ मार्च रोजी नर्मदा विकास प्राधिकरण सह संबंधित सर्व अधिकार्यांची पुलाच्या ठिकाणी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले यानंतर पुन्हा स्थानिक नागरिकांनी आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन योग्य तोडगा न निघाल्यास दहा मार्च रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.








