नंदूरबार l प्रतिनिधी
विटाई (साक्री) येथील सौ.वृषाली नरेंद्र खैरनार यांच्या ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत निवड झालेला ‘दुष्टचक्र’ हा कथासंग्रह अमरावती येथील पायगुण प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात कृतिशील अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली पाटील ऊर्फ वृषाली खैरनार यांनी वंचित, शोषित यांच्या विषयी जाणवणारी सहवेदना या संग्रहातील कथांमधून प्रकट केली आहे.
डॉ.सतीश बडवे यांनी कथासंग्रहाची पाठराखण करताना ‘अंगणवाडीचे विश्व आणि पिचलेल्या स्त्रियांची घुसमट यामुळे वृषालीची कथा स्वतःची वेगळी वाट शोधणारी ठरते.’ असे म्हटले आहे. या संग्रहातील बहुतांश कथा धुळे व जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेल्या आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव कुंदन मॅडम व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेल्या असतांना कथासंग्रहाचे विशेष कौतुक केले. अंगणवाडी कार्यक्षेत्र व ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांना अधोरेखित करणा-या या कथासंग्रहा बद्दल वृषाली खैरनार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. चि.संकेत खैरनार याने संग्रहाच्या आशयाला बोलके करणारे मुखपृष्ठ तयार केले आहे.








