नंदुरबार l प्रतिनिधी
जीपीएफमधील हक्काचा पैसा वापरण्यासाठी अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जीपीएफ खात्यांमधील काही रक्कम काढण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र तब्बल ४ महिन्यांपासून जीपीएफचा शालार्थ टॅब बंद असल्याने शेकडो शिक्षकांचे प्रस्ताव पडून आहेत . नोव्हेंबरपासून भविष्य निर्वाह निधीचा एकही प्रस्ताव निकाली न निघाल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. या पैशांच्या भरोशावर केलेले नियोजनही विस्कटले आहे. शासनाने बीडीएस प्रणाली सुरू करून कर्मचाऱ्यांची हक्काची रक्कम त्यांना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रहार प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनाच ई-मेल द्वारे साकडे घातले आहे.ई-मेलची प्रत मुख्य सचिव वित्त विभाग मुंबई, शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू, राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना प्रहार प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी दिलेल्या निवेदनात वित्त विभागाला आदेशीत करून भाविष्य निर्वाह निधीचा टॅब बी.डी.एस.साठी त्वरित उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या दर महिन्याच्या वेतनातून जीपीएफची ठरावीक रक्कम आपल्या जीपीएफ खात्यात जमा करीत असतात. अत्यंत आवश्यकता असतांना किंवा सेवानिवृत्त होतेवेळी ही रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येते. अनेकांनी मुला मुलींचे लग्न, घराचे बांधकाम व इतर कामांसाठी घर, प्लॉटखरेदी करून आपले प्रस्ताव पाठविले आहेत. गत ४ महिन्यांपासून ते मंजूर झालेले नाही. म्हणून कर्मचारी अडचणीत आले आहे. पैशाची नितांत गरज असताना भविष्य निर्वाह निधीच्या हक्काचा पैसा गरजेच्या वेळी मिळत नसल्याने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या आहेत. जीपीएफ प्रकरण कर्मचारी यांना मंजूर करावयाचे असल्यास शिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तो जि.प. वित्त विभागाकडे जातो. तेथून मंजूर झाल्यावर कोषागार कार्यालयात पाठविले जात होते. तेथून मंजूरीनंतर कर्मचारी यांच्या खात्यात जमा होते. सध्या बी.डी.एस. निघणे बंद असल्याने जीपीएफ प्रकरण शिक्षणाधिकारी, वित्त विभाग लेखाधिकारी यांची मंजुरी घेऊन पडून आहेत. त्यामुळे शिक्षक व कर्मचारी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत.बीडीएस प्रणाली सुरू झाल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबाची आर्थिक संकटातून सुटका होईल.










