नंदुरबार l प्रतिनिधी-
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी धडगाव तालुक्यातील हजारो वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सध्या प्रशासकीय विलंब आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनपट्टा केवायसी आणि फॉर्मर आय डी तयार होण्यास होत असलेल्या प्रचंड विलंबामुळे हे शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नाबाबत शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख गणेश रुपसिंग पराडके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, तातडीने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
धडगाव तालुक्यातील सर्व पात्र वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे वनपट्टा केवायसी युद्धपातळीवर आणि विनाविलंब पूर्ण करण्यात यावे.
ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना तातडीने फॉर्मर आयडी उपलब्ध करून देण्यात यावी,शासनस्तरावरून केवायसी व फॉर्मर आयडी मिळण्यास विलंब होत असल्यास, शेतकऱ्यांना वी के क्रमांकाच्या आधारे तात्पुरती केवायसी पूर्ण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची विशेष मुभा देण्यात यावी.
धडगाव हा अत्यंत दुर्गम व आदिवासीबहुल तालुका असून येथील बहुतांश शेतकरी वनपट्टा जमिनीवर शेती करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. शासनाच्या या महत्त्वपूर्ण कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करताना शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वेळेत केवायसी आणि फॉर्मर आयडी न मिळाल्यास अनेक पात्र शेतकरी या योजनेपासून हुकण्याची भीती निर्माण झाली आहे.
शिवसेनेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र लढा उभारला जाईल. त्यामुळे, शेतकरी हिताचा विचार करून जिल्हा प्रशासन आणि शासन स्तरावरून या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेतला जावा, अशी आग्रही मागणी गणेश रुपसिंग पराडके यांनी केली आहे.








