नंदुरबार l प्रतिनिधी-
अपघात आणि प्रसुती सारख्या प्रसंगात आवश्यक असलेले रक्त उपलब्ध न होण्याच्या घटनांना आदिवासी समाज प्रामुख्याने सामोरा जात असतो. या पार्श्वभूमीवर आदिवासी दिनाचे औचित्य साधून रक्तदानाचे उपक्रम घेण्यात येत आहेत, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. दुर्गम भागात ब्लड बँक नाही त्यामुळे मी खासदार असताना केंद्र सरकारला विनंती करून अक्कलकुवा, धडगाव आणि मोलगी येथील रुग्णालयांमध्ये रक्त संचय केंद्र कार्यान्वित करण्याची मंजुरी मिळवली होती. अशा स्वरूपात यापुढेही रक्त दानाला वेग येण्यासाठी आपण पाठपुरावा करत राहू; असे प्रतिपादन माजी खासदार संसद रत्न डॉ. हिना गावित यांनी केले.
विश्व आदिवासी गौरव दिवसाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कै. दिलबरसिंग पाडवी नगरात माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचा शुभारंभ पार पडला. त्याप्रसंगी डॉक्टर हिना गावीत बोलत होत्या. श्री विद्या विकास संस्था वाण्याविहीर संचलित सातपुडा वैभव विद्यालय व क. कला महाविद्यालय, वाण्याविहीर, श्री अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय, ब्रि. अंकुशविहीर आणि जनकाल्याण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले. भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप वसावे, माजी सभापती किरसिंग वसावे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष नितेश वळवी, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अर्जुन पटले, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड.सुधीर पाडवी, अशोक राऊत, रायसिंग वळवी, धनसिंग दादा, विनोद कामे आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आदिवासी दिनाचे औचित्य साधून फक्त नाच गाणे मिरवणुका आयोजित करण्याऐवजी रक्तदानासारख्या उपक्रमांना प्राधान्य देऊन आदिवासी समाजाला नव्या प्रवाहात आणण्याची अत्यंत गरज आहे. आदिवासी समाजातील स्त्री-पुरुषांनी रक्तदानाबद्दलचे गैरसमज दूर करावे. मोठ्या संख्येने रक्तदानाच्या महत्वपूर्ण कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर हिना गावित यांनी केले. सिकलसेल ॲनिमिया या भागातून नष्ट व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा वेळच्या वेळी रक्त तपासणी होणे आणि शक्य असेल त्यांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. सर्व गावांमधील सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते आणि वैद्यकीय विभागाशी संबंधितांनी याविषयी जागृती घडवावी; असे देखील आवाहन त्यांनी केले.
नागेश पाडवी यांनी प्रास्ताविक करताना रक्तदानाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. किरसिंग वसावे यांनी दुर्गम भागातील रक्तदानाची गरज व्यक्त केली. तर पोलीस निरीक्षक पटले यांनी रक्तदानासाठी युवा वर्गाने मोठ्या संख्येने पुढे यावे असे आवाहन केले.








