नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व लोकजागृतीच्या कार्याचा प्रभावीपणे आढावा घेतला.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थितांची मने जिंकली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या लोकमान्य टिळकांच्या विचारांचा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचा विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून जागर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील होते. संदीप इशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महान व्यक्तिमत्त्वांचे विचार आत्मसात करून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
वकृत्व स्पर्धेचे परीक्षण विद्या पाडवी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेद्र बांगर यांनी व्यक्त केले.







