नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील धावडीपाडा ते भादल रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने डोंगराच्या कडेला रस्त्याचा भाग तुटलेला आहे. धोकादायक वळणावर रस्ता तुटल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावर कौल भरलेला एक ट्रक डांबर वाहून मोठमोठे खड्डे असलेल्या वळणावर कोसळून दरीत पडला, यात वाहचालकाला दुखापत झाली तर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रत्यावर अनेक आदिवासी बांधवाचा मोटरसायकल घसरून अपघात झालेले आहेत. काल मिनेश पावरा या युवकांचा रस्त्यावर आलेल्या खडीवर मोटरसायकल घसरून अपघात झाला त्यात त्याच्या हातपायला दुखापत झाली आहे.
पर्यायी मार्ग नसल्याने याच मार्गांवरून लोकांना प्रवास करावा लागतो, शिवाय नर्मदा परिक्रमा करणारे लोकही याच मार्गाने प्रवास करतात. या रस्त्याचे अनेक ठिकाणी डांबर वाहून गेले आहे,,तेथे ताबडतोब डांबरीकरन करावे, तसेच खोल दरिजवळ तुटलेल्या रस्त्याला संरक्षण भीती बांध्याव्यात, तसेच डोंगराला लागून पाणी वाहून जाण्यासाठी चारी तयार करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सातपुड्याच्या दुर्गम भागात आधीच रस्ते कमी आहेत, त्यात रस्त्यांची दुर्दशा झाल्याने गरोदर महिलांना व रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवहीका देखील जाऊ शकत नाही, पावसाळ्यात हा रस्ता अधिक वाहून गेला तर अनेक पाड्यांचा संपर्क तुटेल तरी शासनाने लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त करावा जेणेरून त्याची पुन्हा दुरावस्था होणार नाही.
– संदीप देवरे, यंग फॉउंडेशन








