नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार पोलीस दलातर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त घोषित करण्यात आला असून.सुपर साडेसात हजार विद्यार्थ्यांनी यावेळी शपथ घेतली.
आज विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पोलीस कवायत मैदानावर आगमन होताच जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्वागत केले.तर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील विविध शाळेच्या सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा झेंडा घेवून भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. नंदुरबार शहरातील श्रीमती कमला नेहरु विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींच्या स्वागतपर स्वागत गीत सादर केले. त्यानंतर दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील होते.यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे,जिल्ह्याशल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, नंदुरबार वनविभागाचे उप वनरक्षक कृष्णा पवार, जिल्हा कृषी अधीक्षक राकेश वाणी, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावीक करतांना सांगितले की, जगभरात गांजा, अफू, चरस यासारख्या अंमली पदार्थांची तस्करी व सेवन वाढल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यास बंदी घालण्यासाठी बैठका झाल्या. त्यानंतर 26 जुन हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे देशातील तरुणांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे वाढू लागली व त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. तसेच वेळोवेळी राज्य शासनाच्या मार्गदर्शक धोरणातही अंमली पदार्थावर निर्बंध घालून त्यावर कडक कारवाई करण्याबाबत कळविले आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये केलेल्या कारवाया पाहून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होवू शकेल अशी सूचना मांडली होती. त्याअनुषंगाने 1 मार्च 2023 रोजी नंदुरबार शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तसेच विविध सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कार्यक्रम घेवून नाशिक परिक्षेत्रात सर्वप्रथम अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरु करून जिल्हा घटकात या अभियानाची दमदार सुरुवात केली.
यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थांची लागवड, तस्करी, विक्री, वाहतूक इत्यादी थांबविण्यासाठी व त्याबाबत माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत करण्यात आला असून 9022455414 असा आहे. ” अंमली पदार्थ मुक्त जिल्हा ” या उपक्रमाचा महत्वाचा भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून अंमली पदार्थ मुक्त जिल्हा ठराव एकमताने मंजूर केले आहेत. गाव पातळीवर पोलीस पाटील, गावातील नागरिक तसेच शाळा महाविद्यालय येथे आजपावेतो एकुण 206 बैठका घेण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीत अंमली पदार्थ मुक्त जिल्हा ठराव मंजूर केल्याने अंमली पदार्थ मुक्त जिल्हा जनजागृती होण्यास गांव पातळीवरील महत्वाचा घटक म्हणून पोलीस पाटील, सरंपच, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, व्यसनमुक्ती केंद्राचे प्रतिनिधी इत्यादींचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाल्यामुळे नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त होण्यास मदत झाली असून त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भव्य असा दिमाखदार कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार शालेय विद्यार्थी, पोलीस पाटील, सरपंच, जिल्ह्यातील नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या अभियानाची जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शॉर्ट फिल्मचे अनावरण करण्यात आले.
त्यानंतर ऑपरेशन अक्षता व अंमली पदार्थ मुक्त जिल्हा योजने अंतर्गत जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचेकडून विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाल्याचे घोषित केला. त्यानंतर हवेत अंमली पदार्थ मुक्त जिल्हा असा मजकुर लिहीलेले फुगे सोडून एकाप्रकारे नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला असा संदेश दिला. अंमली पदार्थ मुक्त झालेला नंदुरबार हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.
कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांपैकी पोतदार इंटरनॅशनल स्कुल नंदुरबार येथील कुमारी सोनाक्षी श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणारे ऑपरेशन अक्षता व अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य करणारे गांव पातळीवरील महत्वाचे घटक पोलीस पाटील नंदुरबार जिल्ह्यातील वडझाकन गावाचे पोलीस सरपंच अनिता वसावे, प्रतापपूर गावाचे पोलीस सरपंच कमल पावरा, डामरखेडा गावाचे पोलीस सरपंच जयश्री पाटील, पालखा गावाचे पोलीस सरपंच सविता पावरा, सरी गावाचे पोलीस सरपंच साकरा पाडवी, मुबारकपूर गावाचे पोलीस सरपंच ताईबाई आहेर, कोयलीविहीर गावाचे पोलीस सरपंच जोवराबाई पाडवी, हाटमोहिदा गावाचे पोलीस सरपंच अश्विनीबाई पाटील, तिळासर गावाचे पोलीस सरपंच सुमनबाई गावीत, सारंगखेडा गावाचे पोलीस सरपंच पृथ्वीराजसिंग रावल तसेच जळखे गावाचे सरपंच किशोर गावीत, होळ तर्फे हवेली गावाचे सरपंच मनिष नाईक, धवळीविहीर गावाचे सरपंच दारासिंग बसावे, मानमोड्या गावाचे सरपंच देविदास पावरा, बोरवण गावाचे सरपंच पिंटू पावरा, भगदरी गावाचे सरपंच पिरेसिंग पाडवी, गणोर गावाचे सरपंच विठ्ठल ठाकरे, पेचरीदेव गावाचे सरपंच वसंत गावीत, घोटाणे गावाचे सरपंच सचिन धनगर, मोठे कडवान गावाचे सरपंच देवलीबाई वळवी, गडद गावाचे सरपंच दिनकर गावीत. कोंढावळ गावाचे सरपंच गोपाळ प्रातिनिधीक विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून गौरव केला.
तसेच दोन्ही उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, महिला सहायता कक्ष येथील सहा. पोलीस निरीक्षक यांचा देखील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून गौरव केला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाल्याचा ऐतिहासिक क्षण नंदनगरीत साजरा होत आहे याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. सदर कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थी बोलविण्यामागील विशेष हेतू स्पष्ट करतांना ते म्हणाले की, आजची तरुण पिढी किंवा विद्यार्थी उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य आहे, देश घडविणारे आहेत. त्यामुळे कोणताही अंमली पदार्थ किंवा इतर प्रकारचे व्यसन न करता त्यांनी शिक्षणावर भर देवून भविष्यात प्रशासनातील उच्च पदस्त अधिकारी व्हावे. अंमली पदार्थामुळे देशाची तरुण कशी वाईट मार्गाला जावून त्यांचे भविष्य खराब करते किंवा वाईट कृत्य करतात हे त्यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षात व यावर्षी अंमली पदार्थ विरोधी केलेली भरीव कामगिरीमुळेच आज नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला आहे. अंमली पदार्थ मुक्त होणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात झालेली आहे याचा त्यांना अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा पोलीस दलातील बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करुन कार्यक्रमाचा शेवट झाला.
तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत नेहरु पुतळा येथे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तयार करण्यात आलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, पंचक्रोशीतील ग्रामस्त, इतर मान्यवर व नंदुरबार शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कुल, पी.जी. पब्जीक स्कूल, चावरा हायस्कूल, श्रॉफ हायस्कूल इत्यादी शाळांमधील सुमारे साडेसात हजार विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी, पोलीस पाटील सरपंच उपस्थित होते.